पुणे |प्रतिनिधि| Pune
बिहार विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर भाजपने आता मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.
त्या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही मुंबई महापालिका भाजपाकडे घेणार असल्याचे वक्तव्य केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या सांगण्यावरून मुंबई महापालिका शिवसेनेला सोडली असेही ते म्हणाले.
पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केले. “आम्ही मुंबई महानगरपालिका भाजपाकडे घेणार आहोत. मागच्या वेळी आम्ही जेव्हा ८२ जागा जिंकलो त्यावेळी महापौर आमचाच झाला असता. परंतु, अमित शाह यांनी आपल्याला राज्य चालवायचं असून मुंबई महानगरपालिका शिवसेनेला सोडा असं सांगितलं होतं. शिवसेनेचे ८४ आणि आमचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. आमचे केवळ दोन नगरसेवक कमी होते,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे की नाही हे त्यांनीच ठरवावं
पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलताना “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचंही शंभर टक्के समर्थन असू शकतं. शरद पवार हे मोठ्या मनाचे मोठे नेते आहेत. मोठ्या पदावर तर बरीच लोकं बसतात, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती या महाराष्ट्रात खूप कमी आहेत, मला कुणाशी तुलना करायची नाही,” असं शेलार म्हणाले होते.
शेलार यांच्या बोलण्याचा रोख सुप्रिया सुळे यांच्या दृष्टीने होता का? याबाबत पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले, त्या पुस्तकाचा संदर्भ देताना त्यांचं ते वक्तव्य होतं. सुप्रिया सुळेंना आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. ते वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठा महिला, भाजपाच्या मराठा महिला किंवा आणखी कोणाबाबत नाही. त्या पुस्तकातल्या बाबींशी त्या वक्तव्याचा संदर्भ आहे. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं का नाही करायचं हे त्यांनीच ठरवायचं असल्याचंही ते म्हणाले.