
मुंबई | Mumbai
राज्यात गेल्या १० महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेवर आले. शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपद मिळविले...
अशातच आता शिंदे गट आणि भाजपने एकत्रितपणे विधानसभा, महापालिका आणि लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला असून या दोन्ही पक्षांनी तशी तयारीही सुरू केली आहे. मात्र, असे असले तरी ही प्रत्यक्षात वेगळेच राजकारण घडताना दिसत आहे. शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघावरही भाजपचा डोळा असल्याचे दिसून येत आहे. भाजपने शिंदे यांच्या १३ खासदारांच्या मतदारसंघांत देखील आपली तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या (Eknath Shinde) १३ खासदारांच्या मतदारसंघात देखील संयोजक नेमले असल्याची माहिती असून आपल्या हक्काच्या मतदारसंघात भाजपने संयोजक नेमल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. भाजपने नाशिक लोकसभा मतदारसंघात देवयानी फरांदे (Devayani Farande) तर शिर्डीत सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना संयोजक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटावर हे भाजपचे दबावतंत्र तर नाही ना? अशी कुजबूज सुरू झाली आहे.
जागावाटपात पुढे काय होईल, ते नंतर ठरणार आहे. परंतु आपल्या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे म्हणून काही करण्याची गरज नाही, असे अजिबात समजू नका, असे निर्देश भाजपकडून खालपर्यंतच्या यंत्रणेला दिले गेल्याची माहिती असून हे भाजपाचे दबावतंत्र आल्याची शिंदे गटात कुजबुज सुरू झाली आहे. भाजपने अचानक हे संयोजक नेमल्याने भाजप शिंदे गटावर कुरघोडी करत आहे काय? असा सवाल केला जात असून शिंदे गटाचे मतदारसंघ ते आमचेच मतदारसंघ अशा पद्धतीने भाजप वागत आहे काय? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे भाजप इतकी संघटनात्मक रचना नाही. त्यामुळे त्यांना भाजपवरच अवलंबून राहावे लागणार आहे. म्हणूनच भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या १३ खासदारांच्या मतदारसंघात देखील संयोजक नेमले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. दरम्यान, भाजपच्या या कृतीमुळे शिंदे-भाजप युतीत मिठाचा खडा तर पडणार नाही ना? अशीही चर्चा आहे.
दरम्यान, संयोजक नेमल्यामुळे शिंदे गटात अजिबात नाराजी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठीच संयोजकांनी नेमणूक करण्यात आली आहे. उमेदवार निवडण्याचा किंवा जाहीर करण्याचा आम्हाला अधिकार नाही. भाजपाच्या या अभियानाचा फायदा आमच्या दोन्ही पक्षांना होणार आहे. शिंदे गट नाराज होण्याचा किंवा अस्वस्थ होण्याचा काहीच प्रश्न नाही. फक्त मोदींजींचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचे करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाकडून देण्यात आली आहे.