दिल्ली | Delhi
करोना संकटाच्या काळात बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील ७१ जागांवर मतदान होत आहे. या निवडणुकीतील मुख्य स्पर्धा एनडीए आणि महायुती यांच्यात आहे. परंतु काही जागांवर ही लढतही तिहेरी होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात आज ७१ विधानसभा जागांसाठी सुमारे १ हजार ६६ उमेदवारांसाठी हे मतदान होत आहे. करोनाच्या सावटामध्ये भारतामध्ये बिहार हे पहिलेच राज्य आहे जेथे मतदान होणार आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत नागरिकांनी मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. हार मध्ये 71 जागांसाठी आज सुमारे 2 कोटी 14 लाख नागरिक आपलं मत नोंदवू शकतात. त्यासाठी 31,380 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. हे मतदान करोनाच्या संकटात सुरक्षित व्हावं यासाठी वेळोवेळी खबरदारी घेतली जात आहे. सॅनिटायझेशनचेही काम सुरू आहे.
सुरक्षेची काळजी घेत आपलं मत नोंदवण्यासाठी बाहेर पडा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्याच पार्श्वभूमीवर ट्विटर द्वारा मतदारांना सुरक्षेचे काळजी घेत आपलं मत नोंदवण्यासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केले आहे.
आठ मंत्र्यांचे भाग्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. त्यातील बिहारचे कृषिमंत्री आणि भाजपा नेते डॉ प्रेम कुमार, जेडीयू नेते आणि बिहारचे शिक्षणमंत्री कृष्णा नंदन वर्मा, भाजपा नेते आणि कामगार मंत्री विजय कुमार सिन्हा, बिहारचे अनुसूचित जाती आदिवासी कल्याण मंत्री ब्रिजकिशोर बिंद, बिहार सरकारचे परिवहन मंत्री आणि जेडीयू नेते संतोषकुमार निराला, ग्रामीण बांधकाम मंत्री आणि जेडीयू नेते शैलेश कुमार, बिहार सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जय कुमार सिंह आणि महसूलमंत्री रामनारायण मंडल यांचा समावेश आहे.