बिहार | Bihar
बिहार विधानसभा निवडणूकीसाठीचे पहिल्या टप्प्याचे मतदान नुकतेच (29 ऑक्टोबर) पार पडले. आता दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी बिहारमध्ये निवडणूक प्रचार जोरदार सुरु आहे. भाजप-जदयू युतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात उतरले आहेत. या सभांवरून लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर बोचरी टीका केली आहे.
नितीश कुमार यांना पाहून बिहार मधील एकही नागरिक मत देणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील माहित आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रॅपीड सभा घ्याव्या लागत आहेत. बिहार निवडणुकीत खूप मेहनत घेत आहेत असे वक्तव्य चिराग पासवान यांनी केले आहे. यावेळी त्यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. ‘ मला कळत नाहीये की भाजप नेते एखाद्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यांसमोर एवढे का दुखत आहेत. अशा वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्ते यांच्या मनोबलावर परिणाम होतोय. नितीश कुमार यांना स्वतःला माहित आहे की ते जास्त जागा जिंकू शकत नाही’, असे देखील चिराग पास्वान यांनी यावेळी सांगितले.
लोकसंख्येच्या आधारे आरक्षण द्या, नितीश कुमारांची मागणी
बिहारच्या राजकीय रणभूमीत आता आरक्षणाचा मुद्दा आला आहे. जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळायला हवे, असे नीतीश कुमार यांनी म्हटले आहे.
“जिथपर्यंत लोकसंख्येचा प्रश्न आहे तो निर्णय जनगणना झाल्यानतंरच घेऊ शकतो. तोपर्यंत निर्णय आपल्या हातात नाही. जातींच्या लोकसंख्येच्या आधारे आरक्षण असावं यामध्ये आमच्यात कोणतंही दुमत नाही,” असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. नितीश कुमार यांनी यावेळी जातीनिहाय लोकसंख्येची गणना व्हावी का यासंबंधी स्पष्ट भाष्य केलं नाही. नितीश कुमार यांनी याआधीही ही मागणी केली आहे. “लोकांनी मला १५ वर्ष त्यांची सेवा करण्याची संधी दिली. त्यांनी पुन्हा संधी दिली तर लोकांमध्ये जाऊन दखल न घेतलेल्या समस्यांबद्दल चर्चा करणार, तसंच त्यांच्यासाठी काम करणार,” असं आश्वासन नितीश कुमार यांनी यावेळी दिलं. “आपल्या सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, अत्यंत मागासवर्ग आणि महादलित यांच्यासह समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न केले आहेत,” हे सांगायला ते विसरले नाहीत.