
मुंबई | Mumbai
आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) पुन्हा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यामुळं आता भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबईतील राजभवनात आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, 'राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी मला वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. परंतू मी ८० वर्षांचा झालो, त्यामुळे मी आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. मात्र, जेव्हा सन्यांसी आणि मुमुक्षरत्न राजभवनात येतात, तेव्हा मला आनंद होतो'.
दरम्यान याच कार्यक्रमात बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळं आता ते पुन्हा नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे.
भगतसिंह कोश्यारींनी हिंदीत भाषण करताना म्हटलं आहे की, 'आज सब कहते है, शिवाजी होने चाहिए, चंद्रशेखर होने चाहिए, भगतसिंह होने चाहिए, नेताजी होने चाहीए, लेकीन मेरे घर में नही, दुसरों के घर में होने चाहिए', असं म्हणत राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांसह चंद्रशेखर आझाद यांच्यासह अन्य महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी राज्यपालांच्या या वक्तव्यावर एका वाक्यात खोचक प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत. महाराष्ट्राची एक परंपरा आहे, लोकांनी पीसी अलेक्झांडर यांच्यापासून अनेक सुसंस्कृत राज्यपाल पाहिलेले आहेत. अतिशय उच्च दर्जाचा व्यवहार असलेले राज्यपाल महाराष्ट्राला लाभलेले आहेत. परंतु भगतसिंह कोश्यारी हे पहिले राज्यपाल आहेत की ज्यांच्यावर लोकांना टीका करावी लागत आहे, असं म्हणत शरद पवारांनी भगतसिंह कोश्यारींना जोरदार टोला हाणला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज याच्याबाबच वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राज्यापालांना परत बोलवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. अद्याप राज्यपालांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने शिवप्रेमी संघटनांकडून महाराष्ट्रभर बंद (Maharashtra) पाळण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही १७ डिसेंबर रोजी मोर्चाची हाक दिली आहे. अशातच कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.