मुंबई | Mumbai
राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यातच ठाकरे-शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निकालानंतर राज्यातील सत्तासमीकरणात काय बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच त्यांचं ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.
दमानिया यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच. बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची”.
पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा वारंवार होतात. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चा होत असतानाच अंजली दमानिया यांच्या या ट्वीटने चर्चांना आणखी वेग आला आहे. त्यामुळे आता यावर अजित पवार (Ajit Pawar) काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.