
मुंबई | Mumbai
शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर हे दोन्ही गट आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले असून यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.
ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. यावर आता ऋतुजा लटके यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणूक लढणार तर मशाल या निवडणूक चिन्हावरच लढणार असून माझ्यावर कोणताही दबाव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या की, "मी निवडणूक लढले तर मशाल चिन्हावर लढेल. बाकी कोणत्या चिन्हावर लढणार नाही. माझे पती रमेश लटके यांची आणि माझी निष्ठा ठाकरे साहेब यांच्यावर आहे. मी आजही आयुक्तांना विनंती करून आजच्या आज राजीनामा मिळवा अशी विनंती करणार आहे. निवडणूक लढली तर ती फक्त मशाल या चिन्हवरच लढणार आहे."
दरम्यान शिंदे गट ऋतुजा लटके यांच्यावरही दबाव आणत आहे. तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा, तुमचा नोकरीचा राजीनामा लगेच मंजूर होईल, असे शिंदे गटाकडून लटके यांना सांगण्यात आल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर शिंदे गटात प्रवेश केल्यास ऋतुजा लटके यांना मंत्रिपदाची ऑफरही असल्याची माहिती आमच्याकडे असल्याचा दावा शिवसेना नेते अनिल परब यांनी केला.