
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्याबाबत सातत्याने नवनव्या बातम्या येत असतात. कधी त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत असतात, तर कधी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चा होत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अनेकदा अजित पवारांची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी केली जातेय. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. त्यातच आता देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis Statement On Ajit Pawar) अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
या सगळ्या घडामोडींदरम्यान भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मत व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. आपण अजित पवार यांना सत्तेत का घेतले? तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काय चर्चा झाली होती? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली.
अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा वारंवार समोर येत असते. अखेर या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ६ महिन्यात परिस्थिती बदलत नसते. त्यामुळे, जेव्हा बनवायचे तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
तसेच, सध्या एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आणि तेच मुख्यमंत्री राहतील, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडमुकांवेळी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांच्याच नेतृत्त्वात आगामी निवडणुका लढवल्या जातील, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी जर हे आमदार अपात्र ठरले तर पर्याय म्हणून अजित पवारांना सोबत घेतले का, त्यांना पुढील ६ महिने मुख्यमंत्री बनवायचे आहे का, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. कारण, मी ६ महिन्यात परिस्थिती बदलून दाखवतो, असे विधान अजित पवार यांनी केले होते. यावर फडणवीसांनी मोठे विधान केले.