
मुंबई | Mumbai
शिवराय आग्रामधून बाहेर पडले तसेच एकनाथ शिंदे बाहेल पडले असं वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांना महाराष्ट्र गद्दार समजतो, खोकेबाज समजतो, त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हे पूर्वनियोजित आहे. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम शिंदे सरकारकडून सुरू आहे. त्यानुसारच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वक्तव्य केले आहे. मंत्री लोढांचे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. केवळ शिवरायच नव्हे तर महाराष्ट्राचाही अपमान आहे.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, आज प्रतापगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन करणारे मुख्यमंत्री राज्यपालांच्या विरोधात एक शब्दही बोलत नाहीत. राज्यपालांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करण्याची वेळ येणे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. किंबहुना या राज्यपालांना वाचवण्यासाठीच तर भाजपच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी सीमा वाद निर्माण केला नाही ना, अशीही शंका येते.