नवी दिल्ली | वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिनानिमित्त देशातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. याप्रसंगी मोदींनी ई ग्राम स्वराज्य मोबाईल अॅप आणि स्वामित्व योजनेचा शुभारंभ केला. स्वामित्व योजनेनुसार सर्व गावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हे केला जाईल त्यानुसार मालमत्तेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र दिले जाईल, त्यामुळे वाद मिटतील आणि कर्ज घेणे सुलभ होणार असल्याचे मोदी म्हणाले.
ते म्हणाले, सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यात ही योजना सुरु होईल. त्यानंतर त्यातील त्रुटी दूर करुन देशभर लागू करण्यात येईल.
शंभर पंचायातीदेखील इंटरनेटने कधी जोडल्या गेल्या नव्हत्या आज सव्वा लाख पेक्षा अधिक पंचायाती डिजिटल झाल्या आहेत. शहर-गावातील अंतर मिटवण्यासाठी आज दोन नव्या योजना ई ग्राम स्वराज आणि स्वामित्व योजना सुरु केल्या आहेत.
पंचायत व्यवस्था जितकी मजबूत, तितकी लोकशाही बळकट आणि विकासाचा लाभ अखेरच्या घटकापर्यंत पोहचण्यास मदत होणार असल्याचे मोदी म्हणाले. प्रत्येक गावांनी स्वावलंबी होणं गरजेचे असून यातून ओढवलेल्या संकटाला तोंड देता येते.
मोदींनी अनावरण केलेल्या अॅपमध्ये काम करण्याची गरज नाही, एकाच ठिकाणी सर्व पंचायतींची माहिती उपलब्ध असेल, गावातील कोणताही नागरिक आपल्या ग्रामपंचायतीची माहिती मोबाईलवर पाहू शकेल, यातून पारदर्शकता वाढेल आणि कामाला गती येईल असे मोदी यांनी सांगितले.
स्वामित्व अॅप
- स्वामित्व योजनेतून ग्रामस्थांना बरेच फायदे मिळतील. यामुळे मालमत्तेवरुन होणारा गोंधळ आणि भांडणे संपतील.
- सर्व गावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून मॅपिंग केले जाईल.
- प्रत्येकाला मालमत्तेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र दिले जाईल.
- यामुळे खेड्यातील विकास योजनांच्या नियोजनास मदत होईल. याद्वारे आपण शहरांप्रमाणे खेड्यांमध्येही बँकांकडून कर्ज घेण्यास सक्षम असाल.
ई-ग्राम स्वराज अॅप
- ई-ग्राम स्वराज अॅपच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा निधी, त्यातील कामकाजाची संपूर्ण माहिती मिळेल.
- गावातील कोणताही नागरिक आपल्या ग्रामपंचायतीची माहिती मोबाईलवर पाहू शकेल.
- या माध्यमातून पारदर्शकताही येईल आणि प्रकल्पांच्या कामांनाही गती दिली जाईल.