Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआज स्मृतिदिन : व्यंगचित्रकार ते शिवसेना प्रमुख, जाणून घ्या बाळासाहेबांचा प्रवास

आज स्मृतिदिन : व्यंगचित्रकार ते शिवसेना प्रमुख, जाणून घ्या बाळासाहेबांचा प्रवास

महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण स्थान असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते.

ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले.

- Advertisement -

फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती.

बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले.

या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली.

इ.स. १९६० पासून ते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ठाकरे लहान मुलांसाठीच्या “श्‍याम‘ या पाक्षिकाचे सुद्धा संपादक होते.

ठाकरेंनी जून १९, इ.स. १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या मते, ‘समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे.’

शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता.या मेळाव्यापासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.

वक्तृत्वाबरोबरच ठाकरे भेदक लेखन देखील करत. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक – वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र आहे, ज्यात संपादक म्हणून बाळ ठाकरे यांचे अग्रलेख असे.

झुणका भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बाँबे चे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही ठाकरेंची होती. व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही त्यांचा होता.

ठाकरे हिंदुत्ववादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही – असे विचार त्यांनी मांडले.

हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी “हिंदुहृदयसम्राट” म्हटले. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणेही ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती

- Advertisment -

ताज्या बातम्या