नाशिक । Nashik
इतिहासकाळात बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा गाळणा किल्ला (मालेगावपासून ३२ किमी अंतर) अनेक भव्य दरवाजे, बुलंद बुरुज, दिमाखदार तटबंदी, देखण्या चर्या, अनेक दुर्गद्वार शिल्पे, सुंदर महिरपी कमान, कलाकुसर केलेली भव्य मशीद, अनेक कातळकोरीव गुंफा, शिलालेख, अंबरखाना, देखणे जलसंकुल अशा नानाविध दुर्गअवशेषांनी ऐश्वर्यसंपन्न बनला आहे.त्यामुळे हा गड खानदेशातील सर्वोत्तम डोंगरीदुर्ग म्हणून इतिहास अभ्यासकांत ओळखला जातो. (सर्व फोटो : रोहित जाधव )
इ.स.१७५२ मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला. त्यामुळे मराठी साम्राज्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या (प्रथम) अधिपत्याखाली किल्ले गाळणाचा कारभार चालत असे. हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत मराठी सत्तेचा अंत होई पर्यंत म्हणजेच इ.स. १८१८ पर्यंत होता. त्यानंतर किल्ले गाळणा इंग्रजांच्या ताब्यात गेला.
किल्ल्यास एकच मार्ग असून अनेक दरवाजे या मार्गावर उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वारांच्या एका दरवाज्यातून दुसऱ्या दरवाज्यापर्यंत येणारा मार्ग पूर्णपणे तोफेच्या माऱ्याच्या टप्प्यात येतो. त्यामुळे हा गड इतिहासकाळात अभेद्य मानला जात असे.
गाळणा किल्ल्याच्या दर्शनीपूर्व बाजूसच भक्कम बांधकाम करण्याचे मुख्य कारण म्हणजे या गडाच्या पूर्व उतारावर असणारे डोंगराचे कंगोरे. या कंगोऱ्यांच्या मदतीने शत्रू सहजपणे वर येऊ शकत असल्यामुळे या बाजूला लांबच लांब तटबंदी व बुरुज बांधण्यात आले आहेत.
किल्ल्यावर पोहचल्यावर एक सुंदर महिरपी कमान पाहायला मिळते. येथून एका मशिदीसमोर येऊन पोहोचतो. या मशिदीच्या जागी १५ व्या शतकात गाळणेश्वर महादेवाचे मंदिर होते. या नावावरूनच हा गड गाळणा नावाने ओळखला जातो.