राजेंद्र पाटील
जळगाव - Jalgaon
महाराष्ट्रात वैभवशाली, संपन्न सांस्कॄतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडिचा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा होय. जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा हा पर्वत असून सुर्यकन्या तापी नदीचा हा भूसंपन्न परिसर.
यावल ते अंकलेश्वर महामार्गावर चोपडा ते यावल राज्य रस्त्याच्या चिंचोली किनगावच्या पश्चिम दिशेला उत्तरेस आडगाव फाटा आहे.
या आडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र अवघे 9 किलोमीटरवर आहे. या आडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्राकडे जातांना 6 किलोमीटर वर श्री हनुमानाचे मंदिर आहे. श्री हनुमान मंदिरापर्यंतची सडक हि पक्की डांबराची आहे. श्री हनुमान मंदिराजवळ सुंदर पाझर तलाव आहे.
श्री हनुमान मंदिरापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र हे जवळपास ३ किलोमीटर वर आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हा 3 किलोमीटरचा कच्चा रस्ता संस्थेने बांधून घेतला आहे. त्यामुळे आता खाजगी वाहने (टू व्हिलर,ऑटोरीक्षा, कार, जीप, टॅक्सी इ.) थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात. जळगाव ते श्री मनुदेवी मंदिर हे 35 कि.मी.आहे.
मंदिराचा इतिहास
श्री मनुदेवी क्षेत्राजवळ गेल्यावरच सुरुवातीला भाविकांच्या स्वागताला उंच उंच वॄक्ष सदैव उभे आहेत. श्री (परशुराम) उभा आहे. अन् हे श्री मनुदेवीचे मंदिर अतिप्राचीन त्यांच्या जुन्या अवशेषावरुन, तेथील उत्खननातून सापडलेल्या मूर्तीवरुन वाटते. या तिर्थक्षेत्राचा शोध सुरुवातीला इ. स. 1251 मध्ये इंगळे घराण्याचे पूर्वज कै. पांडू जीवन इंगळे यांनी घेतल्याचे सांगितले जाते.
या मंदिरापासून सातपुडा पर्वतामध्ये 4 ते 5 कि. मि. अंतरावर गवळी वाड्यांचे अवशेष अजुनही पाहावयास मिळतात. ईश्वसेन राजा या भागात राज्य करीत असतांना त्याने या हेमाडपंथी मंदिराची बांधणी केल्ल्याचे उल्लेख आढळतात.
मंदिराभोवती असलेल्या 13 फूट उंचीच्या व 2 कि. मि. लांबीच्या भिंतीच्या विटा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बूरुजांचे काही भाग ढास ळलेले असले तरी सध्या अस्तित्वात असलेल्ल्या अवशेषांवरुन पूर्वीच्या बांधकामाची रचना अथवा मजबुती याविषयी अंदाज करता येतो.
मंदिराचा निसर्गरम्य परिसर
मंदिराच्या तिन्ही बाजूस उंच कडे असून मंदिराच्या समोर अंदाजे 400 फूट उंचीवरुन कोसळणारा धबधबा आहे. वर्षातील 6 ते 7 महिने कोसळणारया या धबधब्याचे पाणी सातपुड्याच्या पायथ्याशी येते.
येथे शासनाच्या मदतीने पाझर तलाव बांधण्यात आहे. तलावाशेजारीच छोटेशे सुंदर हनुमानाचे मंदिर आहे. त्यामुळे मनुदेवीचा परिसर रमणीय व मनमोहक असा झाला आहे. तसेच येथे भाविंकाबरोबर पर्यटक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, सहली मोठ्या संखेने येत असतात.
तिर्थक्षेत्राविषयी दंतकथा
या तिर्थक्षेत्राविषयी अनेक दंतकथा, लोककथा, तोंडी इतिहास आहे. देवी भागवत पुराणात असा उल्लेख आहे कि विष्णु ब्रम्हा महेश या देवांवर एक मोठे संकट आले असता, राक्षसांपासून सुटका करण्यासाठी या तिन्ही देवतांना गुप्त ठिकाणी म्हणजे सातपुडयाच्या खोल दरीत गुहेत येऊन बसले. ते गुप्त ठिकाण म्हणजे श्री मनुदेवीचे मंदिर होय.
सर्व देवांनी मनाने एक विचार करीत असता, लपलेल्या गुहेत श्वासाने उच्छवासाने एक तेज प्रकट झाले. ती तीव्र तेजस्वी प्रकाशाची ज्योत निर्माण झाली, तो सर्व शक्तीमान प्रकाशाचे देवता मनाचे सामर्थ्य असलेली श्री मनुदेवी प्रकट झाली. तीच मनुदेवी देवांजवळ प्रकट झाल्याने, कोणत्या हेतूने आपण आला आहात, त्यावेळी ब्रम्हा विष्णु महेशांनी देवीस विनंती केली की, हे आदिशक्ती, सर्वमान शक्ती श्री मनुदेवी आमच्यावर फार मोठे संकट कोसळलेले आहे. म्हैषासूर राक्षसाने पॄथ्वीवर सर्वत्र धुमाकूळ, अत्याचार सुरु केल्याने आम्हाला हैराण त्रस्त केलेले आहे. म्हणून त्याचा वध करण्यासाठी तू उग्र रूप धारण करुन त्याचा नि:पात करावा. त्यास नष्ट करावे व सर्व जीव सॄष्टीला भय मूक्त करावे.
ही सर्व शक्तीची प्रार्थना एकून श्रीमनुदेवी देवांना अभयवचन दिले की, मी लवकरच श्री सप्तश्रॄंग देवीचा अवतार घेऊन, येथूनच धावत जाऊन त्या महिषासुर राक्षसाचा वध करेल.
या अभिवचनानुसार श्रीमनुदेवी ही महिषासुर सैन्याचा वध करीत तापी काठावर वसलेले शिरागड येथे युध्द केले. म्हणून त्या ठिकाणी श्रीमनुदेवीचे स्वरूप शिरागडची अष्टभुजा देवी म्हणून आजही विराजमान आहे.
तेथून श्रीमनुदेवीने नांद्रा (बाजारा) येथे युध्द केले तेथे ही अष्टभुजादेवीचे मंदिर आहे. नांद्रा येथून पाटणा या ठिकाणी घनघोर युध्द झाल्याने देवीने तेथे विश्रांती घेतलेली आहे. म्हणून श्री पाटणा देवी येथे श्री श्रीमनुदेवीचे स्वरुप अष्टभुजा देवीच्या सुंदर स्वरुपात प्रकट झालेली असून जागॄत ठिकाण झालेले आहे.