सातपुड्यात निसर्ग बहरलाय…!

jalgaon-digital
3 Min Read

चेतन इंगळे

मोदलपाडा, ता.तळोदा – Modalpada-Taloda

गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे सातपुड्याच्या पर्वतरांगा हिरवाईने नटल्या आहेत. लॉकडाऊनमुळे मागील चार महिन्यापासून घरातच असणार्‍या लोकांची पाऊले स्थानिक पर्यटन स्थळांकडे वळू लागली आहेत.

यामुळे सातपुडा पर्वत रांगावर हिरवा शालू आच्छादला गेल्याचा भास होतो. याशिवाय पावसाने जोर पकडल्यानंतर सातपुड्यातील कोठार, चांदसैली, देवगोई, दहेल या घाटांमध्ये दाट धुके पसरते. या सर्व बाबी सातपुड्याच्या पायथ्याशी राहणार्‍या तरूणाईला मोठ्या प्रमाणात खुणावतात.

यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मे महिन्याच्या उन्हाळी सुटीत कोणालाही पर्यटनासाठी बाहेरील पर्यटन स्थळांवर जाता आले नाही. अजूनही कोरोनाचा धोका टळला नाही. नजीकच्या काळात पर्यटनाचा आनंद कधी घेता येईल, याबाबत निश्चित सांगता येणे शक्य नाही. शासनाने पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी खुली केली तरी लोक कोरोनाच्या भीतीमुळे बाहेरील पर्यटन स्थळांकडे पाठ फिरवतील असा अंदाज आहे.

अश्यातच सातपुडा हिरवळीने बहरल्यामुळे जिल्हातील पर्यटकांची पाऊले सातपुड्याच्या दिशेने वळू लागली आहेत. मागिल शनिवारी व रविवारी सुटीचे दिवस असल्याने अनेक जण आपल्या कुटुंबीयांसह सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये भ्रमंती करतांना दिसून आले.

मागील आठवड्यातील दररोज सातपुड्याच्या पर्वत रांगेत पावसाची हजेरी सुरू आहे. यामुळे कोठार, माकड टेकडी, चांदसैली घाट या परिसरात सकाळपासून दाट धुके पहायला मिळत आहे.

अद्याप दमदार पाऊस झाला नसून सातपुड्यातील नद्या, नाले व धबधबे सुरू झालेले नाहीत. दमदार पाऊस झाला की सातपुड्यातील नदी, नाले व धबधबे खळाळून वाहायला सुरुवात होते. असे असले तरी घरातच बंद असलेल्या नागरिकांना सुरुवातीत सातपुड्यात पसरलेली हिरवळ व त्यासह अनेक नयनरम्य दृश्य भूरळ घालीत आहेत.

लॉकडाऊनमुळे घरातच राहून कंटाळलेले लोक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सातपुड्याच्या कुशीत गर्दी करतांना दिसून येत आहे. तरुण मुले तर आपल्या मित्रांच्या ग्रुपसह दोन-तीन कापड्यांचे ड्रेस व स्वतंत्र कॅमरा घेऊन फोटोग्राफीसाठी दररोज चांदसैली घाटात दिसून येत आहेत. काही आपल्या परिवारासह सातपुड्यातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतांना दिसून येत आहेत.

पर्यटन विकासाचा अभाव : सातपुडा पर्वत रांगात अनेक पर्यटन स्थळे असून पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा विकास अद्याप होऊ शकलेला नाही. पावसाळ्यात नव्हे तर वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतील अशी बरीच स्थळे कोठार ते धडगाव, अक्कलकुवा ते मोलगी या दरम्यान आहेत. अनेक स्थळे तर सह्याद्री व कोकणातील पर्यटन स्थळांच्या तोडीची आहेत. व्ह्यू पाइंट म्हणून ती विकसित करणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे पर्यटकांना सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घेता यावा, यासाठी संरक्षक कठडे, मार्गदर्शक सूचना फलक, उभे राहण्यासाठी व बसण्यासाठी पुरेसी जागा, छत यारख्या अनेक बाबी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

यामुळे सातपुड्यातील पावसाळी पर्यटनाला चालना मिळवू स्थानिकासाठी रोजगार निर्मितीदेखिल होऊ शकते.सातपुड्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सर्व छायाचित्रे चेतन इंगळे यांनी टिपलेली आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *