नाशिक | प्रतिनिधी
विकेंड लॉकडाऊनचे दोन दिवस शांततेत गेल्यानंतर सोमवारी (दि २१) नाशिककरांनी तुफान गर्दी शहरात केली होती. अशोक स्तंभावर बेशिस्त वाहनचालकांनी वाहने वेडीवाकडी घातल्यामुळे मोठी कोंडी झाली. परिणामी, रविवार कारंजा, मेहेर सिग्नल, महात्मा गांधी रोड, रेडक्रॉस सिग्नल आणि मेनरोड परिसरात वाहनांची मोठी गर्दी झाली....
एकीकडे करोनाचे रुग्ण कमी झाल्याने दिलासा मिळालेला असताना दुसरीकडे शहरातील बेसुमार गर्दी धोक्याची घंटा आहे. नाशिक शहर अजूनही तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे शहरात ४ वाजेपर्यंत शिथिलता आहे. त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वेळेत शिथिलता मिळाली असताना अनावश्यक गर्दी नाशिककर करू लागल्याने प्रशासनाच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
तसेच मेनरोड परिसरात स्मार्टसिटीच्या अंतर्गत कामांची लगबग सुरु आहे. याठिकाणी मोठमोठे नाले खोडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. अगदी अरुंद जागेतून प्रवास करून नागरिकांना खरेदी करावी लागते आहे. अशा परिस्थितीतही अनेकजण चारचाकी आणि दुचाकी वाहनांची नाहक गर्दी करतात. यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना तर त्रास होतोच शिवाय वाहतूक कोंडीलादेखील सामोरे जावे लागते आहे.