Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedओळख थोर संतांची

ओळख थोर संतांची

संत तुकाराम

संत तुकाराम महाराजांचा जन्म पुण्यानजीक असलेल्या देहु या गावात झाला. वडील बोल्होबा व आई कनकाई यांच्या पोटी जन्मलेल्या तुकाराम महाराज यांचे आडनाव अंबिले होते. त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभरबुवा हे महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. त्यांचे बालपण सुखात गेले. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.त्यांनी आपल्या रसाळ वाणीत अनेक अभंगरचना केल्या. अभंग हे तुकाराम महाराजांचे वैशिष्ट्य होते, जसे श्लोक वामनाचे, ओवी ज्ञानेश्वरांची, तसे अभंग करावा तुकारामांनीच. त्यांचे अभंग भक्ती, ज्ञान, वैराग्य व नीती या विषयांना धरून आहेत.

- Advertisement -

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. त्यांच्या थोरल्या भावाचे नाव निवृत्तीनाथ तर धाकट्या भावंडांची नावे सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी होती. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक योगी व तत्त्वज्ञ कवी. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभाव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना. संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगाव येथे झाला. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले. ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली.

संत एकनाथ

संत एकनाथ षष्ठीस नाथषष्ठी म्हणतात. शके 1521 ला फाल्गुन षष्ठीस नाथांनी समाधी घेतली. नाथांच्या आयुष्यात या षष्ठीला फार महत्त्व आहे. जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामींना दत्ताचे दर्शन, नाथांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह, जनार्दन स्वामींची समाधी आणि नाथांची समाधी या सगळ्या गोष्टी एका तिथीला झाल्या. नाथांनी संसार करून परमार्थ केला. नाथांचे एकनाथी भागवत ही भागवताच्या 11 व्या स्कंदावरील टीका प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरीची मूळ प्रत मिळवून ती शुद्ध करण्याचे काम एकनाथांनी केले. स्पृश्य-अस्पृश्य भेद नाथांनी कधीही मानला नाही. सर्व प्राणीमात्र एक आहेत असे नेहमी मानले.

संत जनाबाई

संत जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. बालपण गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयतां नियमितपणे पंढरीची वारी करीत असत.

संत गोरोबा

संत गोरोबा कुंभारांची समाधी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी गावात आहे. गोरोबा पेशाने कुंभार होते. संतश्रेष्ठ नामदेव व ज्ञानेश्वरांचे ते समकालीन होते, संत गोराबा हे ज्ञानेश्वर, निवृतीनाथ, मुक्ताबाई, सोपान आदि संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडील होते. त्यामुळे सर्व जण त्यांना गोरोबाकाका म्हणत असत.

संत मुक्ताबाई

संत मुक्ताई या मेहुण (जळगाव जिल्हा), या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहेत.

संत सावता

सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात. सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे सत आहेत.

संत नामदेव

संत शिरोमणी नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.

समर्थ रामदास

संत रामदास स्वामी यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील जांब गावी झाला. त्यांनी समाजातील तरुण वर्गाला आरोग्य आणि सुदृढ शरीराद्वारेच राष्ट्राची उन्नती शक्य आहे हे समजाविले. व्यायाम करून सुदृढ राहण्याचा सल्ला दिला. शक्तीचा उपासक असलेल्या मारूतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. संपूर्ण भारतात त्यांनी पद-भ्रमण केले. देशात चेतना निर्माण होण्याच्या दृष्ट्रीने त्यांनी जागो-जागी मारूतीची मंदिरे स्थापिली. जागोजागी मठ बांधले.

- Advertisment -

ताज्या बातम्या