जगभरातील साहसी गिर्यारोहकांना नेहमीच खुणवणारे जगातील सर्वोच्च शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट. या शिखराला माउंट एव्हरेस्ट हे नाव कसे पडले? जगातील पहिला एव्हरेस्टवीर? पहिला भारतीय अन् पहिले मराठी पाऊल कुणाचे ही माहिती जाणून घेऊ या…
ज्यांच्या नावावरुन एव्हरेस्ट हे नाव पडले ते सर जॉर्ज एव्हरेस्ट यांची १ डिसेंबर रोजी पुण्यतिथी. ब्रिटीश सरकारतर्फे भारतात चालू असलेल्या अखिल भारतीय त्रिमितीय सर्वेक्षण प्रकल्पाचे जॉर्ज एव्हरेस्ट १८४० मध्ये प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हिमालयातील पर्वतरांगाच्या सर्वेक्षणामध्ये महत्त्वाची कामगीरी बजावली गेली. या कामगीरीसाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी जगातील सर्वोच्च शिखराचे नाव त्यांच्या वरुन ठेवण्याचे ठरवले जे आज माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.
पुर्वी हे होते नाव
एव्हरेस्टला पहिल्या प्रथम याला पीक बी असे नामकरण केले. १८४८ मध्ये मोजणीचे काम पुढे सरकल्यावर याचे पीक XV असे नामकरण केले. कांचनगंगा पर्वताला तोवर सर्वात उंच शिखर मानण्यात येत होते. ॲन्ड्र्यू वॉ यांनी सर्वेक्षण उपकरणे वापरून शिखराच्या उंचीची प्राथमिक मोजणी केली व त्यानंतर १८५२ मध्ये डेहराडून व कोलकातामधील कार्यालयांनी गणिते केल्यावर पीक XV ची उंची इतर कोणत्याही शिखरापेक्षा जास्त आढळली व त्यावर सर्वोच्च शिखर म्हणून शिक्कामोर्तब झाले.
शिखराची उंची भारतीयाने मोजली
सर्वप्रथम ॲन्ड्र्यू वॉ यांनी १८५६ मध्ये घेतलेल्या सर्वेक्षणानुसार माउंट एव्हरेस्टची ( तत्कालीन पीक XVची)उंची २९,००२ फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. याकामी राधानाथ सिकदार यांच्यासह अनेक भारतीय गणितज्ञ गुंतले होते व अनेक वर्षे गणिते करून हे मापन मांडले होते. सर्वात अलीकडे एव्हरेस्ट ची उंची ८,८४८ मीटर इतकी उंची अधिकृतरीत्या निश्चित करण्यात आली आहे. तरीही अनेक मापनकर्त्यांच्या मापनांत तफावत आढळून येते. ९ ऑक्टोबर २००५ रोजी चीनने केलेल्या मोजणीप्रमाणे पर्वताची उंची ८,८४४.४३ मीटर ± ०.२१ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. एव्हरेस्टची अचूक उंची राधानाथ सिकदार यांनीच मोजली. या शिखरास त्ंयाचे नाव द्यावे, असा एक ठराव, अटलबिहारी बाजपेयी हे भारताचे पंतप्रधान असताना विचारात घेतला गेला होता. पण तो मंजूर होण्यापूर्वीच भारताचे पंतप्रधान बदलले. एव्हरेस्ट ची उंची ८,८४८ मीटर इतकी उंची अधिकृतरीत्या निश्चित करण्यात आली आहे.
एव्हरेस्ट सर्वोच्चच पण…
एव्हरेस्ट हे जगातील समुद्रसपाटीपासूनची सर्वोच्च जागा आहे यात दुमत नाही. परंतु अनेक पर्वत असे आहेत की ज्यांची बेस कॅंप पासूनची उंची ही एव्हरेस्टच्या बेसकॅंप पेक्षा जास्त आहे. मौना की हा हवाईमधील पर्वत समुद्राच्या तळापासून उंचावतो व जवळपास १०,००० मीटर त्यांची उंची आहे, परंतु पाण्याखाली जवळपास ५,००० मीटर असल्याने प्रत्यक्षात समुद्रसपाटीवरील उंची एव्हरेस्टपेक्षा बरीच कमी आहे.
तेनसिंग नोर्गे व हिलरींचे पहिले पाउल
१९५३ मध्ये ९वी ब्रिटिश मोहीम आखली गेली. या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी ब्रिटिश अधिकारी जॉन हंट यांच्याकडे होते. यांनी पूर्वीच्या स्वीस मोहिमेच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवायचे ठरवले. त्या अंतर्गत, तेनसिंग नोर्गे याला मोहिमेत समाविष्ट करण्यात आले. हंट यांनी गिर्यारोहकांच्या दोन जोड्या बनवल्या. पहिली जोडी टॉम बॉर्डिलॉन व चार्ल्स इव्हान यांनी चढाईचे शर्थीचे प्रयत्न केले शिखरापासून १०० मीटरपर्यंत पोहोचण्यात २६ मे रोजी त्यांना यश मिळाले परंतु तोवर त्यांची फारच दमणूक झाली होती. परंतु त्यांनी बर्फात खोदलेले मार्ग, दोर व नेलेले ऑक्सिजनच्या नळकांड्या याचा फायदा तेनसिंग नोर्गे व न्यूझीलंडचे एडमंड हिलरी या जोडीला झाला. दोनच दिवसांनी नोर्गे व हिलरी या जोडीने शिखरावर साउथ कोलच्या दिशेने कूच केले. २९ मे १९५३ रोजी सकाळी ११ वाजता सरतेशेवटी एव्हरेस्टवर मानवी पाऊल पडले. पहिले एव्हरेस्टवर कोण पोहोचले याचे हिलरी व नोर्गे जोडिने बरीच वर्षे गुपित कायम ठेवले होते. तेनसिंग नोर्गेने आपण हिलरींच्यानंतर पोहोचल्याचे काही काळाने मान्य केले.
बचेंद्री पाल पहिल्या भारतीय
पहिली भारतीय मोहीम १९६०मध्ये राबवली गेली. या मोहिमेचे नेतृत्व ब्रिगेडियर जी. सिंग यांच्याकडे होते. परंतु पहिले यश १९६५ मधील तिसर्या मोहिमेत मिळाले.१९८४ मधील नागरी मोहिमेत बचेंद्री पाल ह्या एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला गिर्यारोहक झाल्या. त्यानंतरही अनेक भारतीय महिलांनी एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळवले आहे.
मराठी पाऊल
१९ मे १९९८ रोजी पुण्याचे सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. हृषीकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकातील सुरेंद्र चव्हाण यांनी १९९८ मध्ये मोसमातील पहिल्या चढाईचा मान मिळवला. यापूर्वी २ मे १९९२ रोजी डॉ. दीपक कुलकर्णी यांना चढाई करताना मरण आले. १९ मे, २०१६ रोजी रफीक शेख यांनी हे शिखर सर केले.