
औरंगाबाद - aurangabad
हवामान विभागाने (Department of Meteorology) जारी केलेल्या यलो (Alert) अलर्टनुसार शहर आणि परिसराला जोरदार पावसाने (Heavy rain) चार तास झोडपून काढले. या चार तासांव्यतिरिक्त दिवसभर रिमझिम सुरू असल्याने जनजीवनावर परिणाम झाला. दिवसभरात ३९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सखल भाग जलमय झाला आहे.
शहरात गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाचा झिम्मा सुरू आहे. दिवसभर रिपरिप सुरू असल्याने जनजीवनावर परिणाम झाला असून, शालेय विद्यार्थ्यांना कसरत करीत शाळा गाठवी लागत आहे. दरम्यान, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार काल मुक्कामी असलेल्या पावसाने दुपारी शहराला झोडपून काढले. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे अनेकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. दुपारी पावणेबारा वाजता जोरदार पावसाला प्रारंभ झाला. सुमारे चार तास बरसल्यानंतर दुपारी पावणेचार वाजता पावसाचा जोर कमी झाला. रिमझिम सुरू असताना पुन्हा सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. सात वाजेपर्यंत मध्यम स्वरूपाच्या हा पाऊस सुरूच होता. त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कमी झाला. या जोरदार पावसाने शहरातील सर्व सखल भाग जलमय झाले होते.
बहुतांश रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहनधारकांना यातून मार्ग काढताना सर्कस करावी लागली. दुपारी सकाळ सत्रातील शाळा सुटण्याची आणि दुपारच्या सत्रातील शाळा भरण्याचा वेळ असताना जोरदार पाऊस सुरू झाल्याने विद्यार्थी आणि पालकांची भंबेरी उडाली. अनेकांना भिजतच घर गाठावे लागले. शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरवासीयांना सूर्यदर्शन झालेले नाही.
तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट
मराठवाडा विभागात पावसाचा जोर वाढत असताना अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी केले जात आहेत. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांना गुरुवारी पुन्हा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात सक्रिय झाल्यापासून पावसाने मराठवाड्याला झोडपून काढले असून, नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. नांदेड येथील विष्णुपुरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत आहे. अशा परिस्थितीत पावसाचा जोर मात्र वाढत आहे. ७ जुलेपासून मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिले जात आहे. हवामान विभागाने औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांना गुरुवारी पुन्हा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.