‘जल बेल ॲप’ : पाणी कधी येणार? आता एका क्लिकवर कळणार

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – aurangabad

नागरिकांना आता एका क्लिकवर पाणीपुरवठ्याचा (Water supply) दिवस आणि वेळ कळणार आहे. पाणीपुरवठ्याविषयी काही समस्या असेल तर नागरिकांना एका क्लिकवर आपली समस्या नोंदवता येणार आहे. यासाठी (Municipal Corporation) महापालिकेकडून ‘जल बेल ॲप’ ची निर्मिती केली जात आहे. ‘स्मार्ट सिटी’चे (Smart City) या कामाला सहकार्य मिळत आहे.

औरंगाबादकरांना सध्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यात ‘एमआयडीसी’कडून तीन एमएलडी पाणी घेऊन सिडको भागातील टँकर या पाण्यातून भरले जात आहेत. हर्सूल तलावापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन जलवाहिनी टाकून दहा एमएलडी पाणी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी झोननिहाय पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ‘एमजेपी’च्या काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले आहे. मुख्य जलवाहिनीवरील गळत्या बंद करण्याचे कामदेखील केले जात आहे. ही कामे सुरू असतानाच महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मदतीने ‘जल बेल अॅप’ तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. लवकरच हे अॅप नागरिकांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

पाणी केव्हा येणार, पाणी येणार की नाही येणार, पाण्याची वेळ काय आहे, पाणी किती वेळ सुरू राहणार, पाणी येणार नसेल तर ते का येणार नाही, त्यामधील नेमकी समस्या काय आहे, पाणी समस्येबद्दल तक्रार कुठे करावी या सर्व गोष्टी जल बेल अॅपद्वारे नागरिकांना समजणार आहेत.

पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी झोन कार्यालयनिहाय नऊ पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक पालक अधिकाऱ्याच्या मदतीसाठी एक पथक देण्यात आले आहे. पालक अधिकारी व त्यांचे पथक झोनचे मॅपिंग करुन व्हॉल्व्हचे नियंत्रण, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक, पाणीपुरवठ्याचा कालावधी, अनधिकृत नळ जोड, पाण्याचा अपव्यय आदी बाबींवर लक्ष ठेवणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *