Friday, April 26, 2024
HomeUncategorizedराज्यात कायद्याचा धाक राहिला नाही

राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही

औरंगाबाद- Aurangabad

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये होणारी वाढ पाहता राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही हे अधोरेखित होत असून शिवशाहीचे वचन देणाऱ्यांनी निझामशाही आणली असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला. तीन पक्षाचे मिळून असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमात महिला सुरक्षा हा विषय नाही का असा सवालही त्यांनी केला.

- Advertisement -

सशस्त्र दरोडेखोरांनी पैठण तालुक्यातील तोंडोळी येथील शेतवस्तीवर हल्ला चढवून दोन महिलांवर बलात्कार केला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी वाघ यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शहरात पत्रकार परिषद घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी भाजप प्रदेश सचिव प्रवीण घुगे, माजी महापौर भगवान घडमोडे, महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष अॅड. माधुरी अदवंत, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, पैठण तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, शहराध्यक्ष अमृता पालोदकर उपस्थित होते.

याप्रसंगी वाघ म्हणाल्या, तोंडोळी गावातील घटना अमानवी आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा राज्यात महिला सुरक्षेचा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. इथे निजामशाही अवतरली आहे की काय असे वाटायला लागले आहे, असेही त्यांनी म्हणत कायद्याचा धाक राहिला नाही त्यामुळे विकृती वाढत आहे, गुन्हेगारांचे धाडस वाढत आहे, असा आरोप केला. तोंडोळीची घटना हा राजकारणाचा विषय नाही. परंतु अशा घटनानंतर जी संवेदनशीलता दाखवायला हवी ती राज्य सरकारकडून दाखविली जात नाही. आरोपींवर अटक करुन कडक कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबाला सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणू असे राज्य सरकारने सांगितले होते, परंतु तो आणलेला नाही. महिला अत्याचारांच्या विषयावर राज्यपालांनी विशेष अधिवेशन घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांनाच उलट पत्र लिहून इतर राज्यातील महिला अत्याचारांचे दाखले दिले. यावरुन हे सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आणि असंवेदनशील आहे हे स्पष्ट होते, असा आरोपही वाघ यांनी केला. तसेच त्यांनी यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली. आम्ही महिला अत्याचारांविरोधात बोलतो तेव्हा विरोधकांचे थोबाड फोडा असे म्हणणारे राऊत तोंडोळीच्या घटनेवर गप्प का असा सवाल केला. दरम्यान, महिला अत्याचाराच्या घटना दररोजच घडत आहेत. अनेक घटनांमध्ये पीडितांना न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात. त्यामुळे आरोपींना वचक बसविण्यासाठी एससी, एसटी अॅट्रॉसिटीप्रमाणे वूमन अॅट्रॉसिटी लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या