"राज्यातील सरकार पडणार नाही"

मनसेला विश्वास
"राज्यातील सरकार पडणार नाही"

औरंगाबाद - aurangabad

महाविकास आघाडी सरकार पडणार, असे दावे (bjp) भाजप नेते, केंद्रीय मंत्री (Narayan Rane) नारायण राणे यांच्याकडून झाले. मात्र, त्यात काही तथ्य नाही. हे सरकार पडेल असे वाटत नाही, असे (mns) मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले. एमआयएमच्या (mim) मुस्लिम आरक्षण मोर्चाविषयी त्यांनी सरकारी नोकऱ्याच कुठे राहिल्या? असा प्रतिप्रश्न केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी औरंगाबादेत आलेले राज ठाकरे म्हणाले, भाजपचे नेते किरीट सोमय्या वैयक्तिक घोटाळे बाहेर काढतात. मला असले घोटाळे काढण्यात अजिबात स्वारस्य नाही. सरकार पाडण्यासाठी केल्या जाणाऱ्या या क्लृप्त्या आहेत. पण मला तरी असे वाटते, सध्या राज्य सरकार पडत नाही. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर ते म्हणाले, शिक्षण व नोकऱ्यांत आरक्षण होते. आता खासगी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे येत आहेत. तिथे आरक्षण नाही. सरकार खासगीकरण करत आहे. सरकारी नोकऱ्या संपल्यातच जमा आहेत. त्यामुळे खासगी कंपन्यांत कुठे आरक्षण देता येईल. त्यामुळे शिक्षण व नोकऱ्यांतील आरक्षण सोयीस्करपणे संपवलेले आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तसाच आहे. राज्याला इम्पिरिकल डेटासाठी फक्त ४३५ कोटी रुपये खर्च येईल. खरं म्हणजे, दोन-तीन तासांत ४३५ कोटींचा भ्रष्टाचार केला जातो. पंधरा-वीस वर्षांत जेवढी जातींची बजबजपुरी वाढलेली दिसते आहे, तेवढी यापूर्वी कधीही दिसली नाही, असेही ते म्हणाले.

जय श्रीरामच्या घोषणा

राज ठाकरे यांचे २२ महिन्यानंतर शहरात आगमन झाले. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सभागृहात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या. ठाकरे यांचे आगमन होताच राज साहेब अंगार है, बाकी सब भंगार है, राज साहेब आगे बढाे, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com