Monday, April 29, 2024
HomeUncategorizedसंततधार पावसाने पालेभाज्या महागल्या

संततधार पावसाने पालेभाज्या महागल्या

औरंगाबाद – Aurangabad

सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दर्जेदार मालास अधिक भाव आला असून लसणासह कांद्याचाही तोरा वाढला आहे. तर नेहमी मागणी असलेल्या बटाट्याचे भाव काहीसे कमी झाले आहे. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतमालावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फळ व (Vegetable market) भाजीपाला मार्केटमध्ये दर्जेदार भाजीपाल्याची आवक मंदावल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

पांढरे लसण बाजारात ६० ते ७० रुपये प्रती किलोने मिळत असले तरी, दर्जेदार मालाचे भाव मात्र आठ दिवसांतच २० रुपयांनी वाढून आता १०० रुपये प्रती किलोच्या घरात गेले आहे. १२० ते १३० रुपयांनी मिळणारे गावरान लसणाचे भाव किलोमागे १८० रुपये झाल्याचे विक्रेते येवलेकर यांनी सांगितले. तर वांगेच्या भावही किलोमागे दहा रुपयांनी वधारले असून सध्या ४० ते ४५ रुपये भाव झाला आहे.

फ्लॉवर, शेवगा, भेंडी, गवार, कारले आदीचे भावही आठ दिवसात काहीसे वाढले आहेत. सध्या फ्लॉवर ४० रुपये, शेवगा ६० रुपये, भेंडी ४० रुपये, गवार ५० रुपये, कारले ५० रुपये प्रती किलो असा दर झाला आहे. यात नेहमी मागणी असलेल्या बटाट्याचे भाव किलोमागे ५ रुपयांनी कमी झाले असून सध्या १५ रुपये प्रती किलो भाव झाला आहे. यासह अद्रक २० ते २५ रुपये, गाजर ३० ते ४० रुपये, शिमला मिरची २५ ते ३० रुपये, पत्ताकोबी १५ ते २० रुपये, दुधी भोपळा ३० रुपये, दोडके ५० रुपये, टोमॅटो २० रुपये, हिरवी मिरची ३० रुपये प्रती किलो असे दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पावसामुळे पालेभाज्यांना मोठा फटका बसला असून दर्जेदार मालाची आवक मंदावली. परिणामी, पालेभाज्याच्या दरात दुप्पट वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

यात प्रामुख्याने कांद्यासह लसणाचा तोरा अधिक वाढला आहे. आठ दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात २० रुपये प्रती किलोने मिळणाऱ्या दर्जेदार कांद्यासाठी सध्या ग्राहकांना अधिकचे ५ ते १० रुपये मोजावे लागत आहे. २५ ते ३० रुपये प्रती किलो असा सध्याचा दर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या