औरंगाबाद – Aurangabad
विविध धर्मांत प्रबोधनाचे विचार मांडण्यात आले आहे. संतपीठाच्या माध्यमातून जीवनासाठीची आवश्यक मानवी मूल्ये याचे शिक्षण, संशोधन कार्य राबविण्यात येणार आहे. या संदर्भात अभ्यास मंडळ स्थापन करून सप्टेंबरपासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले (Dr. Pramod Yewale) यांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संचलित संत एकनाथ महाराज संतपीठ सुरु करण्यासंदर्भात संवाद बैठकीचे आयेजन करण्यात आले. संतपीठच्या सभागृहात ही बैठक झाली. यावेळी त्यांनी सांगितले की, संतपीठात विविध पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येईल. महाराष्ट्रात तीन विद्यापीठे संताच्या नावाने आहेत. संतपीठ देखील आगामी दोन-तीन वर्षात नावारुपाला येईल, असा विश्वास कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ.श्याम शिरसाठ, डॉ.राजेश करपे यांनीही मार्गदर्शन केले. एम.ए. (संत साहित्य ) हा अभ्यासक्रम सुरु करावा, अशी सूचना डॉ.सतीश बडवे यांनी मांडली, समन्वयक डॉ.प्रवीण वक्ते यांनी प्रास्ताविक केले. डॉ.हंसराज जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
चार दशकांपासून प्रलंबित असलेला संतपीठाचा प्रश्न मार्गी लागला. मंञी उदय सामंत आणि कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी संतपीठ कार्यान्वित करुन संवाद साधला. याबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. संतपीठातील अभ्यासक्रम, शिक्षण, साधनांची उपलब्धता, निधी यासह विविध विषय मांडले. सर्व धर्मातले प्रबोधन परंपरा याविषयी या ठिकाणी अभ्यासक्रम राबविण्यात यावेत. संत ज्ञानेश्वर ते आजपर्यंतच्या सर्व संताचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध असलेल, अशी अपेक्षाही उपस्थितांनी मांडली.
तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.अ.र. अंतुले यांच्या कार्यकाळात संतपीठाला मान्यता मिळालेली आहे. मात्र प्रत्यक्षात सुरु व्हायला चार दशकांचा काळ लागलेला आहे. आता यंदाच्या आषाढी वारी व नाथषष्टी पूर्वी स्वप्न साकार झाले. याबद्दलही अनेक वारक-यांनी समाधान व्यक्त केले. कमी वेळेत संतपीठाचे काम प्रगतीने सुरु केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभिनंदन बोरकर, कुलकर्णी व भगत यांचा सत्कार केला.