औरंगाबाद- (Aurangabad) –
मूळ कर्जदारावर कोणतीही कारवाई न करता तसेच गहान रिक्षा जप्त न करता सहजामीनदार रिक्षाचालकाला (co-guarantor ) कर्ज भरण्याच्या नोटीसा पाठवून आणि त्याच्या घरी जाऊन छळले. त्यामुळेच रिक्षाचालकाने (rickshaw driver) आत्महत्या (suicide) केली. या प्रकरणी रविवारी पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात शेख इम्रान शेख अब्दुल माजिद (रा. दादा कॉलनी, कैलासनगर), जावेद साबेर कुरेशी (रा. सिल्लेखाना), अंकुश रामराव कांबळे (रा. चिकलठाणा), अनंत लऊळकर (रा. एरंडवणे, ता. पुणे) आणि बजाज फायनान्सच्या कर्मचार्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे लऊळकर हा बजाज फायनान्सचा वकिल आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली.
रिक्षाचालक संतोष कडूबा पावसे (32, रा. रामनगर, मुकुंदवाडी) यांनी 25 सप्टेंबरला राहत्या घरी गळफास (hanging) घेऊन आत्महत्या केली होती. रात्री आठ वाजता हा प्रकार मुकुंदवाडी पोलिसांना समजला. मूळ परमिटधारक शेख इम्रान याच्या नावे बजाज फायनान्समधून कर्ज घेऊन दोन वर्षांपूर्वी एलपजी रिक्षा (क्र. एमएच-20-ईके-0057) खरेदी केला होता. तेव्हा अंकुश कांबळे हा एजंट होता. लॉकडाऊनमुळे व्यवसाय न झाल्याने हफ्ते थकले. त्यात तगादा सुरु झाल्यामुळे शेख इम्रानने ही रिक्षा जावेद कुरेशीला विकली. तसेच हफ्ते जावेद कुरेशीने भरण्याबाबत करारनामा करण्यात आला. मात्र, जावेदनेही हफ्ते भरले नाहीत. त्यावर संतोष यांना फायनान्सच्या नोटीसा येत होत्या.
पोलिसांनी कारवाई न केल्यास मृतदेह ठाण्यात आणण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावरुन नातेवाईक व रामनगर भागातील नागरिकांनी मुकुंदवाडी ठाण्यासमोर गर्दी केली होती. यात अतुल घडामोडे, सुभाष पाटील पांडभरे, सुनील सुर्यवंशी, बापू घडामोडे, सुभाष शुक्ला, मोहन साळवे आदींचा समावेश होता. त्यांनी पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांची भेट घेऊन फायनान्सच्या गुंडांविरुद्ध कारवाईची मागणी केली.