औरंगाबाद - aurangabad
राज्यातील (Zilla Parishad School) जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठीचे मोबाईल ॲप (Mobile app) पूर्णपणे विकसित झाले आहे. या ॲप'द्वारे केल्या जाणाऱ्या बदल्यांमध्ये काही त्रुटी राहू नयेत आणि या त्रुटीच्या आधारे बदलीनंतर उच्च न्यायालयात (High Court) दाखल होणाऱ्या आव्हान याचिका टाळण्यासाठी या मसुद्याची फेरतपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या मसुद्यात सरकारने तब्बल ३१ दुरुस्त्या करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार या ॲपसाठीच्या मसुद्यात (डेटा) समाविष्ट करण्यात आलेली जिल्हानिहाय शिक्षकांची संख्या, सुगम ब दुर्गम शाळांची नावे, सर्व शिक्षकांची प्राथमिक माहिती, आधार आणि पॅन कार्ड क्रमांकाची पुर्नपडताळणी करण्याचे सांगण्यात आले होते. शिवाय राज्य सरकारने मोबाईल द्वारे केल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांसाठी एक शिक्षक, एक मोबाईल नंबर अनिवार्य केला आहे.
आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या मोबाईल ऍपद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बदल्यांसाठी स्वतंत्र मोबाईल ऍप विकसित केले आहे. आयुष प्रसाद यांच्याच अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या पाच सीईओंचा समावेश असलेल्या अभ्यास गटाने राज्य सरकारला ही शिफारस केली होती. सरकारने ही शिफारस सरकारने स्वीकारली आहे.
मोबाईल नंबर अपडेशन
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला लवकरच सुरुवात होत आहे. ऑनलाइन माहिती भरताना राज्यातील दीड हजार शिक्षकांनी आपले बंद असलेले मोबाईल नंबर दिले आहेत. या दीड हजार शिक्षकांनी आपले चालू असलेले मोबाईल नंबर देण्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. चालू असलेले मोबाईल नंबर मिळाले की बदली प्रक्रिया सुरू करायला कोणतीही अडचण येणार नाही. मोबाईल नंबर अपडेट झाले की कोणत्याही क्षणी बदली प्रक्रिया सुरु होऊ शकते असे शिक्षक संघाने म्हटले आहे.