औरंगाबाद - aurangabad
महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) माध्यमिक व उच्च माध्यमिक (Board of Education) शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत (ssc, hsc Examination) यंदा शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने कडक नियमावली केली आहे. परीक्षा केंद्रांवर (Examination Center) परीक्षेच्या दिवशी विषय शिक्षकांना वावरण्यास बंदी घातली आहे. पेपरमध्ये विषय शिक्षकांद्वारे कॉपी देण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्चदरम्यान, दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. यंदा शाळा तिथे परीक्षा केंद्र दिल्याने पूर्वी केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना मुख्य परीक्षा केंद्र, तर नव्याने केंद्र दिलेल्या शाळा, महाविद्यालयांना उपकेंद्र असे संबोधण्यात येणार आहे.
मुख्य व उपकेंद्राचे कामकाज पाहणारे केंद्र संचालक हे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य राहतील. १५ पेक्षा कमी आवेदनपत्रे भरलेल्या शाळा मुख्य केंद्रास जोडण्यात आल्या आहेत. परिरक्षक कार्यालयातून मुख्य परीक्षा केंद्रास प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी सहायक परिरक्षक राहतील. मुख्य केंद्राकडून उपकेंद्रांकडे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी संबंधित उपकेंद्राचे शिक्षक (रनर) असतील. परीक्षेच्या दिवशी विषय शिक्षकांना परीक्षेचे काम देऊ नये अशा स्पष्ट सूचना मुख्याध्यापकांना मंडळाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.