
केपटाऊन | Cape Town
आयसीसी महिला टी २० वर्ल्डकप २०२३ (ICC Women T20 World Cup 2023) चा साखळी सामन्यांचा थरार आटोपला असून आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य सामन्यांसाठी अंतिम ४ संघ निश्चित झाले आहेत. भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia), दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) संघांमध्ये उपांत्य फेरीचे सामने खेळवण्यात येणार आहेत...
गुरुवारी महिला वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघांमध्ये केपटाउनच्या न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:३० वाजता खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाचं कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे असणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचं कर्णधारपद मेग लाँनिंग सांभाळणार आहे. भारतीय संघाने ग्रुप २ मध्ये ४ सामने खेळले असून, ३ विजय आणि १ पराभव स्वीकारला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने आपले चारही सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताला नमवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्याचा कांगारूंचा प्रयत्न असणार आहे. अखेरच्या साखळी सामन्यात दोन्ही संघांनी विजय संपादन केला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे तर भारतीय संघाने आयर्लंड संघावर डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी मात केली आहे. त्यामुळे दोन्ही संघ उपांत्य सामन्यात आपली विजयी मोहीम कायम राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. आयसीसी महिला वर्ल्डकप २०२० मधील अंतिम सामन्यातील पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतणार आहे.
दोन्ही संघांची साखळी सामन्यातील कामगिरीवर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड , बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. भारतीय संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास पाकिस्तान , आयर्लंड , वेस्टइंडीज संघाचा पराभव केला आहे. तर इंग्लंडविरुद्ध साखळी सामन्यात भारतीय महिला संघाचा ११ धावांनी पराभव झाला आहे.
दोन्ही संघांची साखळी सामन्यातील कामगिरी बघितल्यास ऑस्ट्रेलिया संघाची बाजू विजयासाठी मजबूत दिसत आहे. ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. भारतीय संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे.
सलिल परांजपे, नाशिक.