दिल्ली | Delhi
विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत (India vs South Africa) पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक भावनिक पोस्ट शेअर करून कसोटी कर्णधारपद सोडले आहे.
विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी हा निर्णय मोठा धक्काच होता. विराट कोहलीच्या या निर्णयामागे बीसीसीआयच काहीतरी डाव असल्याच्या प्रतिक्रिया विराट समर्थकांकडून पाहायला मिळत आहेत. दरम्यान विराटने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहितने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. पण अखेर रविवारी त्याने सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या.
रोहित शर्माने विराट आणि त्याचा एक फोटो पोस्ट करत म्हंटल आहे की 'धक्का बसला!! पण भारतीय कर्णधार म्हणून यशस्वी कार्यकाळ केल्याबद्दल अभिनंदन. भविष्यासाठी शुभेच्छा'
दरम्यान क्रिकेटच्या देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विराट कोहलीनं घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिलीये. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटच्या माध्यमातून विराट कोहलीच्या या निर्णयासंदर्भात आदर व्यक्त केलाय. भारतीय संघाचे नेतृत्व करताना तू यशस्वी कामगिरी करुन दाखवली आहेस. तू नेहमीच १०० टक्के क्षमतेनं योगदान दिले आहेत, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टरने विराट कोहली यशस्वी कर्णधार असल्याचे म्हटले आहे. यशाचा सर्वोच्च टप्पा गाठणाऱ्या विराट कोहलीचे त्याने अभिनंदनही केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
विराट कोहलीने कर्णधार पद सोडतांना काय म्हटलंय?
कोहलीने म्हंटले आहे की, “सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले असून कोणतीही कसर सोडली नाही. कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच वेळ आहे. या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढ-उतार आले आणि माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढ-उतार आले, पण या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची कमतरता आली नाही किंवा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आली नाही. माझा १२० टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता.”
विराट कोहलीने २०१४ मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ९९ सामने खेळले असून ७९६२ धावा केल्या आहेत. यातील ६८ सामन्यांमध्ये विराटने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आणि या कालावधीत एकूण ५८६४ धावा केल्या.