मुंबई l Mumbai
भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) संघात कसोटी मालिकेतील शुक्रवारपासून (३ डिसेंबर) सुरु झालेला दुसरा आणि अखेरचा सामना भारताने ३७२ धावांनी जिंकला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या चौथ्याच दिवशी भारताने हा विजय मिळवत २ सामन्यांची मालिका १-० अशा फरकाने जिंकली.
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीचा हा पहिला विजय ठरला. न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या ६२ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ७ बाद २७६ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. या घोषणेसह भारताने न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य दिले, पण पाहुण्यांना हे आव्हान पेलवले नाही.
या विजयासह भारताने ही मालिका १-० अशी जिंकली सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत १२ गुणांची कमाई केली. याआधी भारताने २०१५मध्ये दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३७ धावांनी विजय नोंदवला होता. मयंक अग्रवालला सामनावीर तर रवीचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
दरम्यान न्यूझीलंडचा मुंबई कसोटीत पराभव जरी झाला असला तरी त्याच्यासाठी ही ऐतिहासिक अशी कसोटी ठरली आहे. न्यूझीलंडच्या ऐजाज पटेलने या सामन्यात एका डावात १० विकेट घेण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो जगातील फक्त तिसरा गोलंदाज ठरला आहे.