
मुंबई | Mumbai
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (ICC ODI World Cup) आज साखळी टप्प्यातील ४५ वा आणि शेवटचा सामना भारत आणि नेदरलँड (India vs Netherlands) यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा हा निर्णय टीम इंडियाच्या शिलेदारांनी सार्थ ठरवला असून नेदरलँडसमोर ५० षटकांत ४ गडी गमावत ४१० धावांचा डोंगर उभारला आहे...
भारताच्या डावाची रोहित शर्मा आणि शुभमन गिलने (Rohit Sharma and Shubman Gill) झंजावती सुरुवात करतांना नेदरलँडची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी अवघ्या ११.५ षटकात १०० धावांची सलामी दिली. त्यानंतर गिल ५१ धावा करून बाद झाला. तर रोहित शर्मा सुद्धा ६१ धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने भारतीय संघाचा (Indian team) डाव सांभाळात दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली.
मात्र, विराट कोहली या सामन्यामध्ये मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच ५१ धावांवरती बाद झाला. त्यामुळे तीन फलंदाजांची शतके हुकली. यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी दीड शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. यात केएल राहुलने १०४ धावा केल्या. तर श्रेयस अय्यर १२८ धावा करून नाबाद राहिला. तर सूर्यकुमार यादव ०२ धावांवर नाबाद राहिला.
दरम्यान, भारतीय संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नसून सर्व ०८ जिंकले आहेत. अशा स्थितीत संघाला सलग ०९ व्या विजयाची नोंद करायची आहे. तर रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला १५ नोव्हेंबरला सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा (New Zealand) सामना करायचा आहे.