अहमदाबाद | Ahmedabad
भारत (India) आणि विंडीज (West Indies) यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना (ODI) शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi Cricket Stadium) खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे...
तसेच रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने (India) वेस्ट इंडीजला (West Indies) ३-० अशी धूळ चारली आहे. तिसऱ्या सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, भारताची सुरुवात निराशाजनक झाली. ४२ धावांवरच भारताचे तीन खेळाडू बाद झाले होते. रोहित शर्मा (Rohit Sharma) १३ धावा करून बाद झाला. त्यापाठोपाठ विराट कोहली (Virat Kohli) एकही धाव न करता बाद झाला. शिखर धवनदेखील (Shikhar Dhawan) १० धावांवर बाद झाला.
अवघ्या ४२ धावांवर तीन मोठे फलंदाज बाद झालेले असताना श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतने सावध खेळी करत भारताचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. ऋषभ पंतने ५४ चेंडूत ५६ धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने १११ चेंडूत ८० धावा केल्या. दीपक चहरने ३८ चेंडूत ३८ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनेही ३४ चेंडूत ३३ धावा केल्या. ५० षटकात भारतीय संघाचा डाव २६५ धावांवर आटोपला.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच धक्के दिले. त्यातून अखेरपर्यंत वेस्ट इंडिजचा डाव सावरू शकला नाही. वेस्ट इंडिजचे अवघ्या २५ धावांमध्येच तीन खेळाडू बाद झाले होते. वेस्ट इंडिजने १०० धावसंख्या गाठेपर्यंत ७ खेळाडू माघारी परतले. वेस्ट इंडीजचा संपूर्ण संघ १६९ वर बाद झाला.
प्रसिध कृष्णा, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज या भारताच्या वेगवान त्रिकुटाने जबरदस्त गोलंदाजी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. श्रेयस अय्यरला सामनावीर, तर प्रसिध कृष्णाला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताने तिसरा एकदिवसीय सामना ९६ धावांनी जिंकला.