दिल्ली | Delhi
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात विराटच्या बॅटने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आहे.
किंग कोहलीने मैदानावर येताच झटपट धावा गोळा करायला सुरुवात केली आणि आपले शानदार शतक झळकावले. विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील ४६ वे शतक पूर्ण केले आहे. या शतकाने त्याने भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याचबरोबर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.
विराट कोहलीने ८५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या या खेळीत १० चौकार आणि १ षटकार लगावला. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे ७३वे शतक आहे. विराटने कसोटीत क्रिकेटमध्ये २७ शतके झळकावली आहेत, तर टी-२० क्रिकेटमध्ये एक शतक केले आहे.
महान फलंदाजांपैकी एक, सचिन तेंडुलकरच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आहेत. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत ४६३ सामने खेळले आणि एकूण १८४२६ धावा केल्या. एकदिवसीय कारकिर्दीत त्याने ४९ शतके आणि ९६ अर्धशतके केली आहेत. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके आहेत जो एक विश्वविक्रम आहे.
विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध वनडेत फलंदाजी करताना सर्वाधिक वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याच्या बाबतीत एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. विराटने २१ वेळा श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम केला. या यादीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अव्वलस्थानी आहे.
सचिनने श्रीलंकेविरुद्ध वनडेत २५ वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा चोपल्या आहेत. विराट आणि धोनी हे संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी असून त्यांनी प्रत्येकी २१ वेळा अशी कामगिरी केली आहे. यानंतर तिसऱ्या स्थानी पाकिस्तानचा फलंदाज सईद अन्वर असून त्याने २0 वेळा श्रीलंकेविरुद्ध ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याची कामगिरी केली.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडियाने यापूर्वीच श्रीलंकेवर २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला हा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईट वॉश द्यायचा आहे.