अहमदाबाद l Ahmedabad
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून झॅक क्रॉली आणि डॉमिनिक सिब्ले डावाची सुरूवात केली. मात्र, सलामी ही जोडी फार काळ मैदानात दम धरू शकली नाही. अक्षर पटेलने आपल्या पहिल्याच षटकात सिब्लेला त्रिफळाचित केलं. सिबलेला पाठोपाठ अक्षरने दुसरा सलामीवीर झॅक क्रॉलीला टिपलं. झॅक केवळ ९ धावा करून परतला. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटही फार काळ मैदानात तग धरू शकला नाही. मोहम्मद सिराजने जो रुटचा अडथळा दूर केला. इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तर डॅनियल लॉरेन्सने ४६ धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना फिरकीचा जलवा दाखवला. भारताकडून अक्षर पटेलनं सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर आर अश्विनने ३ बळी घेत साथ दिली. तसेच मोहम्मद सिराजनेही इंग्लंडच्या २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लवकर बसला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने डावाच्या पहिल्याच षटकात सलामीवीर शुबमन गिलला शुन्य धावेवर पायचीत केले. त्यामुळे सलामीवीर रोहित शर्माला साथ देण्यासाठी चेतेश्वर पुजाराला पहिल्याच षटकात मैदानात यावे लागले. मात्र यानंतर रोहित आणि चेतेश्वरने भारताचा डाव सांभाळत दिवसाखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. त्यामुळे आता हे दोघे दुसऱ्या दिवशी भारताकडून फलंदाजी सुरु करतील.
दरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहलीने देशासाठी सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व कर्णधार कर्णधारांच्या एलिट यादीत एमएस धोनीची बरोबरी केली आहे. धोनीने कर्णधार म्हणून भारताचे कसोटी क्रिकेटमध्ये ६० सामन्यात नेतृत्व केले आहे तर कोहलीचा कर्णधार म्हणून हा ६० वा सामना आहे.
दोन्ही संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे तर भारत सध्या २-१ने आघाडीवर आहे. चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला मात्र, पुढील 2 सामन्यात भारताने इंग्लंडवर मात करत जबरदस्त पुनरागमन केलं. आता यजमान संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी चौथ्या सामान्य विजय किंवा ड्रॉची गरज आहे.