दिल्ली | Delhi
भारत विरुद्ध इंग्लंड संघात कालपासून (५ फेब्रुवारी) ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) सुरू आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने धडाकेबाज द्विशतक ठोकले.
दरम्यान, जो रूटचे विक्रमी द्विशतक, डॉम सिब्ली आणि बेन स्टोक्सच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाविरुद्ध ८ विकेट गमावून ५५५ धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या दिवशी रूट आणि स्टोक्सच्या जोडीने पहिल्या सत्रात संघाला झटका लागू न देता आक्रमक भूमिका घेत फलंदाजी केली. रुटने ३७७ चेंडूत १९ चौकार आणि २ षटकारासह २१८ धावा केल्या. रुट, स्टोक्स आणि सिब्लीच्या खेळीमुळे इंग्लंड मजबूत स्थितीत पोहचला. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी ३ बाद २६३ धावांपासून खेळण्यास सुरुवात केली. रूटने २६० चेंडूत १५० धावा पूर्ण केल्या. सलग तीन सामन्यात त्याने १५० किंवा अधिक धावा केल्या आहे. त्यानंतर, स्टोक्सने केवळ ७३ चेंडूत २३वे अर्धशतक पूर्ण केले. रूट आणि स्टोक्सची जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना नदीमने स्टोक्सला ८२ वैयक्तिक धावसंख्येवर चेतेश्वर पुजाराकडे झेलबाद केले. स्टोक्स बाद झाल्यावर रुटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० व्या सामन्यात षटकार खेचत द्विशतक पूर्ण केलं. ओली पोपच्या रुपात इंग्लंडला पाचवा धक्का बसला आहे. पोपने ३४ धावांची खेळी केली, त्यानंतर अखेर रूट ३७७ चेंडूत १९ चौकार आणि २ षटकारासह २१८ धावांवर माघारी परतला. नदीमने रुटला एलबीडब्लयु आऊट केलं. यादरम्यान, इंग्लंडने ५०० धावांचा टप्पा ओलांडला असताना इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये इंग्लिश टीमला दोन झटके दिले आणि सलग दोन चेंडूवर जोस बटलर आणि जोफ्रा आर्चरला बाद केलं. बटलरने ३० धावा केल्या तर आर्चरचा पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडाला.
सामानाच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रॉरी बर्न्स ६० चेंडूत ३३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर नवखा डॅन लॉरेन्सदेखील शून्यावर बाद झाला. त्याला बुमराहने पायचीत केले. पण त्यानंतर जो रूट आणि सिबलीने २०० धावांची भागीदारी केली. सिबली ८७ धावांवर पायचीत झाला आणि पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.