
अहमदाबाद | Ahmedabad
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय संघही या आव्हानाचा जोमाने पाठलाग करत आहे.
मात्र, यादरम्यान भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकले आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील विराटचे ७५ वे शतक आहे. विशेष म्हणजे जवळपास ३ वर्षानंतर म्हणजे १२०४ दिवसानंतर कोहलीनं कसोटी शतक ठोकलं आहे.
याआधी अखेरचं कसोटी शतक कोहलीनं बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर २०१९ मध्ये ठोकलं होतं. त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च २०२३ मध्ये शतक ठोकलं आहे. आजच्या डावात विराटनं केवळ ५ चौकार ठोकत हे शतक केलं आहे. एकही षटकार त्यानं आज ठोकलेला नाही.
विराटने २० जून २०११ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हा पासून कोहलीने आतापर्यंत भारतीय संघासाठी १०८ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ४८ च्या सरासरीने ८३२८ धावा केल्या आहेत. यामध्ये २८ शतके, ७ द्विशतके आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीने या कालावधीत कसोटीत ९३१ चौकार आणि २४ षटकारही मारले आहेत.