औरंगाबाद - Aurangabad
शहरातील व्हीआयपी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर मनसेने बुधवारी श्राद्ध घालत आंदोलन केले. लवकरात लवकर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरूस्ती केली नाही, तर मनसे भ्रष्टाचारी अधिकारी आणि कंत्राटदारांना या खड्ड्यात गाडेल, असा इशाराही मनसेने दिला आहे.
शहरातील सिडको टी पॉइंट ते हर्सूल टी पॉइंट रोड म्हणजेच व्हीआयपी रोड हा वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. मागील वर्षभरापासून या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून हजारो नागरिक ये-जा करतात. या रस्त्यावर खड्डे असल्याने नागरिकांना प्रचंड ञास होत आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे काम मे महिन्यामध्येच करण्यात आले होते. या रस्त्यासाठी बांधकाम विभागाने जवळपास 60 लाख रुपये खर्च केले आहेत. माञ, पाऊस पडताच या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहे. या रस्त्यांवर हे जे खड्डे पडले आहे, ते या अधिकारी आणि कंत्राटदाराच्या भ्रष्ट कारभारामुळे पडले आहे, असा आरोप मनसेने आंदोलनप्रसंगी केला. मनसेने या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना बुधवारी श्राद्ध घालत निषेध व्यक्त केला आहे. यावेळी, मनसेचे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे, शहर अध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी, शहर उपाध्यक्ष अब्दुल रशीद खान, राजू खरे,विभाग अध्यक्ष अशोक पवार यांची उपस्थिती होती.