औरंगाबाद- वाढत्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरामुळे त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. औरंगाबाद प्रशासनाकडे पुरेशा प्रमाणात रेमडेसिवीर उपलब्ध असले तरी भविष्यातील गरज पाहता पर्याय म्हणून टॉक्लीझूमॅब इंजेक्शनचा वापर करण्याचे आवाहन विभागीय आययुक्त सुनील केंद्रकेर यांनी आरोग्य प्रशासनाला केले. तसेच जिल्ह्यात लिक्वीड ऑक्सिजनसाठा देखील मुबलक आहे. मात्र भविष्यातील परिस्थिती पाहता खासगी रुग्णालयांनी स्वतःचे ऑस्किजन प्लांट उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजन वापरासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बोलत होते. यावेळी खा. डॉ. भागवत कराड, इम्तियाज जलील, आ. हरीभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाठ, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, आ. रमेश बोरनारे, जि.प. अध्यक्षा मिना शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदवले यांच्यासह संबंधीत अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त म्हणाले की, कोरोना उपचारासाठी सर्वच रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते. त्यामुळे गरजु रुग्णांनांच ऑक्सिजन लावावे. ऑक्सिजन वापरतांना अनावश्यक वापर, गळती, इत्यादीकडेही लक्ष दयावे. तरच भविष्यातील ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीला आळा घालणे शक्य होईल. 30 पेक्षा जास्त बेड्स असणार्या खाजगी रुग्णांलयांनी ऑक्सिजनसाठी प्रशासनावर अवंलबून न राहता स्वत:च्या रुगणालयात ऑक्सिजन प्लान्ट तत्काळ उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.