औरंगाबाद जिल्ह्यात 'ब्रेक द चेन' शिथिल करा

सत्ताधारी आमदाराची मागणी 
औरंगाबाद जिल्ह्यात 'ब्रेक द चेन' शिथिल करा

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून शहराचा पॉझिटिव्हिटी रेट फक्त 2 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध 1 जूनपासून शिथिल करावेत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुसर्‍या लाटेत कोरानाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यात पुन्हा अत्याआवश्यक सेवा वगळता ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत 31 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र 1 जूनपासून लॉकडाऊन पुन्हा वाढवला जाणार का? यावरून व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक व सर्व सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्यात राबवलेले माझे कुटुंब माझी जबाबदारी यासह अन्य यशस्वीपणे राबविलेल्या मोहिमा व त्याला नागरिकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद यामुळे आपण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यशस्वी झालो. मात्र हे करत असताना मागील दोन महिन्यांपासून राज्यात अत्यावश्यक सेवा वगळात इतर दुकाने बंद आहेत. त्यामुळे छोटे-मोठे व्यावसायिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.

कमाई काहीच नाही परंतु त्यांचा दुकांनाचा किराया, वीज बिल, कर भरण्यासह अन्य खर्च सुरूच आहेत. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यापार्‍यांबरोबरच तिथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडून केली जात असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

हातावर पोट असणार्‍या नागरिकांना लॉकडाऊनमुळे काम नसल्याने त्यांचे देखील प्रचंड हाल होत आहे. रोजगार नसल्याने आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध 1 जूनपासून शिथिल करावेत अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com