औरंगाबाद - Aurangabad
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सलीम अली सरोवरातील हजारो मासे अचानक मृत्यूमुखी पडले आहेत. रविवारी ही बाब पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते हा विषप्रयोग शक्यता जास्त असल्याचे बोलले जाते.
शहराच्या दिल्ली गेट आणि मजनू हिलच्या परिसरात डॉ. सलीम अली सरोवर आहे. गेल्या काही वर्षांपासून हे सरोवर पर्यटकांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. सरोवराच्या परिसरात नागरिकांना प्रवेश देण्याबद्दल पक्षिमित्रांनी आक्षेप घेतल्याने आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाला सरोवर बंद ठेवावे लागले. बंद ठेवण्यात आलेल्या सरोवरात जलपर्णीचे साम्राज्य वाढले आहे. आता याच सरोवरातील मासे मृत्यूमुखी पडल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. सरोवरातील मासे मृत्यूमुखी पडत असल्याचे सुरक्षारक्षक आणि सरोवराच्या परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. मेलेल्या माशांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे.
सरोवरातील मासे मेल्याची माहिती मिळताच महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे म्हणाले, 'दूषित पाण्यामुळे किंवा ड्रेनेजच्या पाण्यामुळे मासे मेले आहेत असे वाटत नाही. कुणीतरी विषप्रयोग केलेला असण्याची शक्यता आहे. मेलेले मासे अनेकांनी पोत्यात भरून नेल्याचे सुरक्षारक्षकांचे म्हणणे आहे. सरोवरातील पाणी आणि मेलेले मासे यांचे नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नुमने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवणार आहोत. तपासणीचा अहवाल आल्यावर सर्व बाबी स्पष्ट होतील.'