औरंगाबाद – Aurangabad
शासनाने रिक्षांचे परमिट खुले केल्यानंतर अनेकांनी ते घेतले आहे. मात्र, १२०० च्या वर रिक्षाचालकांनी परमिटची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याची माहिती समोर आली आहे. अशा अपूर्ण किंवा इरादा पत्रावर रिक्षाखरेदी करून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांचे परमिट रद्द करण्याची प्रक्रिया औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने सुरू केली आहे.
रिक्षा चालकांना स्वत:ची रिक्षा घेऊन व्यवसाय सुरू करता यावे. यासाठी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परमिट खुले करण्याचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत शहरात गेल्या तीन वर्षांपासून रिक्षांचे परमिट वाटप करण्यात येत आहे. या अंतर्गत अनेक जणांनी रिक्षा परमिटसाठी अर्ज करून आरटीओ कार्यालयात इरादापत्र सादर करून रिक्षा खरेदी करण्यासाठी दाखल केला आहे. यातील अनेकांनी आर्थिक अडचण दाखवून रिक्षा खरेदीसाठी मुदतवाढ करून घेतलेली आहे. तर काहींनी इरादापत्राच्या आधारे रिक्षा खरेदी करून घेतली आहे.
रिक्षा खरेदी केल्यानंतर अनेक रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयाचे शुल्क भरलेले नाही. लॉकडाउन पूर्वीपासून अशा रिक्षाचालकांना शुल्क भरून परमिटची प्रक्रिया पूर्ण करावी, याबाबत आरटीओ विभागाकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली होती. मात्र ज्यांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशांवर, करोना संकटामुळे आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे ज्या परमिट धारक रिक्षा चालकांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा रिक्षा चालकांचे परमिट रद्द करण्याचा प्रस्ताव परिवहन आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. परिवहन आयुक्तांकडून अशा रिक्षा चालकांचे परमिट रद्द करण्याबाबत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.