औरंगाबाद - Aurangabad
शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातही होणार्या अपघातांवर (Accident) नियंत्रण ठेवण्यासाठी सम-विषम (पी 1, पी 2) पार्किंग व्यवस्था (Parking arrangements) करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी जारी केले आहेत. यासाठी तालुकानिहाय विशिष्ट ठिकाणांवर पार्किंग व्यवस्था करावी लागणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका व इतर बाजारपेठांच्या ठिकाणी ग्रामीण भागात पार्किंग गैरसोयीअभावी वाहन अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाहनधारक कुठेही पळी वाहने पार्क करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघातांचे प्रमाण वाढीस लागते. यात जीवित व वित्त हानी देखील होते. यासाठी जिल्ह्यातील 11 प्रमुख ठिकाणी सम विषम (पी 1, पी 2) रेखांकन करण्यासाठी नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत, मुख्याधिकारी, ग्रामविकास अधिकारी व संबंधित यंत्रणेला चव्हाण यांनी आदेशित केले आहेत.
यामध्ये पैठण तालुक्यातील औरंगाबाद रोड, नगर रोड, गार्डन रोड, भाजी मार्केट रोड या रस्त्यांवर, गंगापूर तालुक्यातील लासुर रोड, गणपती रोड, राजीव गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रस्त्यावर, फुलंब्री तालुक्यात खुलताबाद रोड, फुलंब्री शहर मुख्य रस्त्यावर, शिलेगावात लासूर स्टेशन रोड, वैजापूर तालुक्यातील औरंगाबाद ते नाशिक रोड, गंगापूर ते वैजापूर रोड व तिलक रोडवर, कन्नड शहरात हिवरखेडा रोड, मुख्य रस्त्यावर, पोलीस ठाणे रोडवर, खुलताबादेत डॉ. आंबेडकर चौक तर कमान मोहल्ला रस्त्यावर, सिल्लोड शहरात औरंगाबाद ते जळगाव रोड व भोकरदन रोडवर, सोयगावात सोयगाव ते बनोटी रोड, सोयगाव ते फर्दापूर रोड, सोयगाव ते गलवाडा रोड, सोयगाव ते जुना बाजार पट्टा रोडवर, पाचोडमध्ये मुख्य रस्त्यावर आणि बिडकीनमध्ये औरंगाबाद ते पैठण रोड या मुख्य रस्त्यासह चितेगाव येथे सम-विषम पार्किंगबाबत रेखांकन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केल्या आहेत.