औरंगाबाद - aurangabad
वीज ग्राहकांनी (Power consumer) नियमित वीज बिलाचा भरणा न केल्याने थकबाकीचा डोगर उभा राहिला आहे. त्यामुळे महावितरणला (MSEDCL) अनंत आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (Marathwada) मराठवाडयात गेल्या ३ वर्षापासून घरगुती, व्यापारी, औद्योगिक व इतर ६ लाख ४७ हजार ६२२ वीज ग्राहकांनी एकही रूपया न भरल्याने १५९० कोटी ५५ लाख ३२ हजार रूपये थकवले आहेत. त्यामुळे थकबाकीच्या डोंगरामुळे थकबाकी व वीज चोरी जास्त असणाऱ्या फिडरवर भारनियमन करण्याची वेळ आली आहे. थकबाकीदार कोणीही असो, त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे सक्त आदेश महावितरणने संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
(Electricity bill) वीज बिल वसुलीसाठी सर्व वर्गवारीतील ग्राहकांपर्यंत पोहचून पाठपुरावा करण्यासाठी महावितरणने हर घर दस्तक, एक गाव एक दिवस उपक्रम, एक वार्ड एक दिवस उपक्रमासह मार्च महिन्यात विविध उपक्रम राबवून जनजागृती केली. वसुलीसाठी ग्राहकांच्या घरोघरी जावून बिल भरल्याची पडताळणी करून बिले भरून घेणे, सतत पाठपुरावा करणे, वीज बिल दुरूस्ती व बिले भरण्यासाठी मेळावे घेणे, प्रचार, प्रसिध्दी व विविध माध्यमातून जनजागृती करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. तरीही औरंगाबाद परिमंडलात सर्व वर्गवारीतील २ लाख ३२ हजार ७५४ वीज ग्राहकांनी ३ वर्षापासून ५३४ कोटी ८३ लाख ७३ हजार रूपये थकविले आहे. लातूर परिमंडलात सर्व वर्गवारीतील २ लाख ३३ हजार ७३ वीज ग्राहकांनी ३ वर्षापासून ५५२ कोटी ५६ लाख ४६ हजार रूपये थकविले आहे.
नांदेड परिमंडलात सर्व वर्गवारीतील १ लाख ८१ हजार ७९५ वीज ग्राहकांनी ३ वर्षापासून ५०३ कोटी १५ लाख १४ हजार रूपये थकविले आहे. असे एकूण मराठवाडयात गेल्या ३ वर्षापासून सर्व वर्गवारीतील ६ लाख ४७हजार ६२२ वीज ग्राहकांनी एकही रूपया न भरल्याने १५९० कोटी ५५ लाख ३२ हजार रुपये थकविल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक समस्थेला सामोरे जावे लागत आहे.