नवी दिल्ली -
देशभरातील शेतकर्यांचा विरोध असतानाही केंद्र सरकारने आणलेले तीन नवे काळे कृषी कायदे काँग्रेस सत्तेत आल्यास
रद्द करु असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबमधील जनतेला दिले आहे. पंजाबमधील मोगा येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या शेती वाचवा यात्रेत ते बोलत होते.
ते म्हणाले, मी तुम्हाला खात्री देतो की काँग्रेस पार्टी सत्तेत आल्यास आम्ही हे तिन्ही काळे कायदे मोडीत काढू आणि कचर्याच्या डब्यात फेकून देऊ. या कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणातील शेतकर्यांचा सर्वाधिक विरोध असून त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे.
हा सर्व प्रकार शेतकर्यांची जमीन आणि पैशाबाबतचा आहे. पहिल्यांदा मी हा प्रकार भठ्ठा परसौलमध्ये पहिला. जेव्हा यांना पाहिजे तेव्हा ते शेतकर्यांची जमीन हिसकावून घेत होते. आम्ही भूमिअधिग्रहण कायदा बदलला आणि तुमच्या जमीनीचं रक्षण केलं. बाजारा मुल्यापेक्षा चारपट जास्त भाव दिला. मोदी आले आणि त्यांनी आमचा नवा कायदाच बदलून टाकला. शेतकर्यांच्या जमीनीसाठी आम्ही संसदेत लढलो होतो. शेतकर्यांना संपवण्याचा सरकारचा डाव आहे, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले.
सध्याचे सरकार हे कळसुत्रीच्या बाहुल्यांप्रमाणे काही मुठभर लोकांच्या तालावर नाचत आहे. पंजाब-हरयाणातील शेतकर्यांनी भारताला खाद्य सुरक्षा दिली. आमच्या सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती, पीक खरेदी आणि बाजाराची रचना तयार केली होती. मोदी सरकारने ती संपवू पाहत आहे. मात्र, काँग्रेस हे होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिकाही राहुल गांधी यांनी यावेळी मांडली.