पोंगल सणादरम्यान खेळण्यात येणारा जलीकट्टू हा तामिळनाडूचा पारंपारिक खेळ आहे. तामिळनाडूतील या प्रसिद्ध पारंपरिक खेळाला 'मंजू विरट्टू' असेही म्हटले जाते. कित्येक शतके जुना असा हा प्राचीन खेळ खेळण्याची परंपरा तामिळनाडूत जपली जात आहे. जाणून घेऊया या पारंपारिक खेळाविषयी.
जल्लीकट्टू हा बैलांना नियंत्रित करण्याचा खेळ आहे. बंद जागेतून विशेष प्रशिक्षित बैल सोडले जातात, बाहेर लोकांची फौज खेळण्यासाठी सज्ज असते. बॅरिकेडच्या बाहेरही मोठ्या संख्येने प्रेक्षक त्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करतात. बैल सोडताच तो धावत बाहेर येतो, ज्याला पकडण्यासाठी लोक तुटून पडतात. खेळातील खरं कौशल्य म्हणजे बैलाचे वशिंड (खांद्याचा वर आलेला भाग) पकडून त्याला थांबवणे आणि नंतर शिंगात कापडाने बांधलेले नाणे काढणे आहे.
बिघडलेल्या आणि रागावलेल्या बैलाला नियंत्रित करणे सोपे नाही. या प्रयत्नात बरेच लोक अपयशी होतात. यात अनके लोकं जखमी होतात. या खेळात जीवितहानी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण या खेळाप्रती खेळाडू आणि प्रेक्षकांची उत्कंठाही पाहण्यालायक असते. या खेळामध्ये विजेत्याला मोठ्ठ बक्षीस दिले जाते.
जल्लीकट्टू हा निव्वळ ग्रामीण खेळ असून तामिळनाडूच्या प्राचीन परंपरेशी संबंधित आहे. काही लोकं त्याचा इतिहास अडीच हजार वर्षे जुना सांगतात. खेळाची सुरुवात इ.स.पू ४००-१००, ज्याला तमिळ शास्त्रीय कालखंड म्हणतात. 'जल्ली' हा शब्द प्रत्यक्षात तमिळ शब्द 'सल्ली' वरून आला आहे ज्याचा अर्थ 'नाणे' आणि कट्टू म्हणजे 'बांधलेला'.
जल्लीकट्टूमध्ये सहभागी होणारे बैल हे विशेष जातीचे असतात. वर्षभर पौष्टीक आहार देऊन त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण घेणाऱ्या बैलांची वैद्यकीय चाचणीही केली जाते, त्यानंतरच त्यांची जल्लीकट्टूसाठी नोंदणी केली होते. यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना नोंदणी आणि वैद्यकीय चाचणीही द्यावी लागते.
दरम्यान प्राणीप्रेमींच्या संघटनेच्या आवाहनावरून सर्वोच्च न्यायालयानं २०१४ मध्ये जलीकट्टू स्पर्धेवर बंदी घातली होती.प्राण्यांची क्रूरता, शेकडो लोक जखमी आणि प्राणहानी यांचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, याला सर्वत्र स्तरातून विरोध दर्शवण्यात होता. जलीकट्टू खेळाची पंरपरा जपणारे केवळ सामान्य लोकच रस्त्यावर उतरलेले नाहीत तर अभिनेता कमल हसन, संगीतकार ए.आर. रहमान, प्रख्यात बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद, आर.अश्विन, श्री.श्री.रविशंकर आदी तामिळनाडूतील सेलिब्रिटी मंडळीही या खेळाच्या समर्थनार्थ उभी ठाकली आहेत
दरम्यान, तामिळनाडूनं परंपरा आणि विश्वासाचा हवाला देत या निर्णयाविरोधात आंदोलन केलं. अखेर एका अध्यादेशाद्वारे खेळाची परंपरा पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली.
ज्या दिवशी जल्लीकट्टू होतो, त्या दिवशी तामिळनाडूचे लोक एकतर कार्यक्रमस्थळाजवळ असतात किंवा त्यांच्या घरी टीव्हीला चिकटलेले असतात. रस्त्यावर शांतता असते. क्रिकेटप्रमाणे लाइव्ह कॉमेंट्री असते. येथील सर्व चॅनेल फक्त जल्लीकट्टू दाखवतात. जल्लीकट्टू पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते बडे नेते-अभिनेते येतात.