नवी दिल्ली -
नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकर्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी
दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर सोशल मीडियावरील ट्विटरने सुमारे 500 अकाऊंट बंद केले आहेत. ट्विटरने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
ट्विटरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर जवळपास 500 ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर काही अकाऊंटना लेबल लावण्यात आली आहेत. या अकाऊंट्सवर नजर ठेवली जाणार आहे. या अकाऊंट्सवरून चिथावणीखोर पोस्ट शेअर केल्यास किंवा तशा आशयाच्या पोस्ट केल्यास त्याविरोधात रिपोर्ट करता येऊ शकेल, असेही ट्विटरकडून सांगण्यात आले.