नवी दिल्ली
बाबरी मशीद विध्वंस (babari masjid) प्रकरणाचा निकाल आज (बुधवारी) लखनऊ येथील विशेष सीबीआय न्यायालय देणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह सर्व ३२ आरोपींनी कोर्टात हजर राहावे, असे आदेश न्यायाधीश एस.के. यादव यांनी दिले आहेत. तब्बल २८ वर्षानंतर या खटल्याचा निकाल येणार आहे.
कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली होती. लालकृष्ण अडवाणी, कल्याण सिंग, उमा भारती यांच्यासह ३२ आरोपींवर बाबरी मशिदी पाडल्याचा कट केल्याचा आरोप आहे.
४९ जणांवर एफआयआर, १७ जणांचे निधन
अयोध्याच्या बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण ४९ जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यातील १७ जणांचे निधन झाले आहे. पहिली एफआयआर फैजाबाद पोलिस ठाण्यात रामजन्मभूमीच्या एसओ प्रियंवदा नाथ शुक्ला यांनी आणि दुसरी एफआयआर एसआय गंगा प्रसाद तिवारी यांनी दाखल केली होती. उर्वरित ४७ एफआयआर वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या पत्रकार आणि फोटोग्राफरने दाखल केली होती. यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयला सोपवली गेली होती. सीबीआयने बाबरी विध्वंस प्रकरणाचा तपास करून एका वर्षापेक्षाही कमी कालावधीत ५ ऑक्टोबर १९९३ रोजी ४९ आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले. पण १३ आरोपींना विशेष न्यायालयाने आरोपांच्या स्तरावरच डिस्चार्ज केले. याला प्रथम उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.