
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
तांदळाची निर्यात (Rice Exporter) करणारा सर्वात मोठा देश भारतात बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी आली (Ban On Non-Basmati Rice) आहे. याचा परिणाम अनेक देशांवर पडल्याचे पाहायला मिळत असून त्यांनी भारताकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केलीये. वाढत्या दराने अनेक देशांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. जगातील अनेक देश तांदळासाठी भारतावर निर्भर आहेत. तांदळावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी या देशांनी भारताकडे केली आहे.
सिंगापूर, इंडोनेशिया, फिलिपिंस या देशांनी तांदळाच्या वाढत्या किंमती पाहून भारताकडे निर्यातबंदी उठवण्याचे आवाहन केले आहे. हे देश तांदळासाठी भारतावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली असून भारत सरकारने पुन्हा निर्यात सुरु करावी अशी विनंती केली असून मिंटने दिलेल्या रिपोर्टनुसार, सिंगापूरने भारताकडून ११०००० टन तांदळाची मागणी केली आहे. जून महिन्यात इंडोनेशियाने अल नीनोच्या संकटापूर्वी भारताकडून १० लाख टन तांदुळ खरेदी करण्याची घोषणा केली होती.
अलीकडेच संयुक्त राष्ट्र जागतिक खाद्य कार्यक्रमाअंतर्गत भारताकडे २ लाख टन तांदळाची मागणी करण्यात आली होती. कोविड-१९ आणि युक्रेन युद्धामुळे खाद्य पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्यात भारताने तांदूळ निर्यातबंदी निर्णय घेतल्याने खाद्य असुरक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने तांदुळ निर्यात बंदीला घातक असल्याचे म्हटले होते.
जगभरात महागाई वाढत असून भारतात ही महागाईने उच्चांक गाठला आहे. नरेंद्र मोदी सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदीसह अनेक उपाय करत आहे. येत्या लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकारला महागाई नियंत्रणात ठेवावी लागणार असल्याने येत्या काळात सरकारकडून आणखी काही कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. अशावेळी भारतावर अवलंबून असलेल्या देशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
नुकतेच सिंगापूरने तांदूळ निर्यातीबाबत आम्ही भारत सरकारशी चर्चा करत आहोत असे म्हटले. सिंगापूरमध्ये ३० देशातून तांदूळ आयात केला जातो. त्यात २०२२ मध्ये भारतातून आयात केलेल्या तांदळाचे योगदान ४० टक्के इतके होते. निर्यातबंदीमुळे बिगर बासमती तांदळाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सिंगापूरमध्ये बिगर बासमती तांदूळ जवळपास १७ टक्के आयात केला जातो.
या देशांची चिंता वाढली
भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. जागतिक व्यापारात भारताचा ४० टक्के हिस्सा आहे. भारत सरकारने २० जुलैरोजी बिगर बासमती तांदूळ निर्यातीवर बंदी आणली. घरगुती किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. बांगलादेश, नेपाळसह भारताचे शेजारील देश तांदळासाठी भारतावर निर्भर आहेत. त्यामुळे या देशांची चिंता वाढली आहे.