
नवी दिल्ली | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 'मन की बात' (Man Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करत आहेत. मन की बात कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. आज २७ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा १०४ वा भाग आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी चंद्रयानच्या (Chandrayaan-3) यशाचा उल्लेख करत मिशन चंद्रयान हे नव्या भारताच्या उर्जेचे प्रतीक असल्याचे सांगितले.
यावेळी पंतप्रधानांनी म्हटले की, "चांद्रयानाचे यश हे खूप मोठे आहे. प्रत्येक ठिकाणी चांद्रयानाची चर्चा होत आहे. यशाचा सूर्य हा चंद्रावर देखील उगवतो असे चांद्रयानाच्या यशानंतर म्हटले जात आहे. चांद्रयान भारताचे असे स्पिरीट बनले आहे, जे कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त जिंकण्याचे ध्येय साध्य करु शकते."
पीएम मोदी म्हणाले, भारताच्या मुली आता अनंत समजल्या जाणाऱ्या अवकाशालाही आव्हान देत आहेत. जेव्हा एखाद्या देशाच्या मुली एवढ्या महत्त्वाकांक्षी बनतात, तेव्हा त्या देशाला विकसित होण्यापासून कोण रोखणार? पुढील महिन्यात होणाऱ्या G-20 परिषदेसाठी भारत पूर्णपणे तयार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पुढे बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, "भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20 चे व्यासपीठ हे सर्वसमावेशक बनले आहे. भारताच्या निमंत्रणावरुनच आफ्रिकन देश हे जी-20 परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता आफ्रिकन देशाचा आवाज हा जगातील महत्त्वाच्या व्यासपीठावरुन प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे."