
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यासाठी ईडी (ED) आणि सीबीआयचा (CBI) मनमानी वापर केल्याचा आरोप काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखालील 14 राजकीय पक्षांनी केला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर मांडले असून या याचिकेवर ५ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
काँग्रेस, आप, डीएमके, आरजेडी, बीआरएस, टीएमसीसह 14 राजकीय पक्षांचा यात समावेश आहे. या प्रकरणी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, न्यायालयाने अटक आणि जामीन याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करावीत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर 5 एप्रिलला सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.