
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Parliament) २० जुलैपासून सुरू होणार असून ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी शनिवारी ही माहिती दिली...
प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून सर्व पक्षांना पावसाळी अधिवेशनात फलदायी चर्चेला आणि विधिमंडळाच्या कामांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, २०२३चे संसदेचे मान्सून सत्र २० जुलैपासून सुरु होईल आणि ते ११ ऑगस्टपर्यंत चालेल. २३ दिवस चालणाऱ्या या सत्रात एकूण १७ बैठका होतील. त्यासाठी मी सर्व राजकीय पक्षांना संसदेच्या कायदेविषयक आणि अन्य कामकाजामध्ये सहभागी होण्याची विनंती करतो. असे त्यांनी म्हटले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे मुद्दे गाजण्याची शक्यता
संसदेच्या या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) समान नागरी कायद्याचे विधेयक (UCC) देखीस याच अधिवेशनात आणण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनातच समान नागरी कायद्याचे विधेयक सभागृहात मांडले गेले तर यावर असलेल्या राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे यावरून जोरदार गदारोळ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
तसेच दिल्लीतील केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाचे पडसाद देखील या अधिवेशनात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफर पोस्टिंगच्या प्रकरणी नायाब उपराज्यपाल यांना अधिकार देण्याच्या विधेयक संसदेतील घमासानाचे कारण ठरू शकते. या दोन मुद्द्यांवर हे अधिवेशन चांगलेच तापण्याची शक्यता आहे.